नाशिक : नाशिकमध्ये होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध विज्ञान साहित्यिक आणि खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर भूषविणार आहेत. संमेलनाच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यानिमित्ताने ‘लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट’, ‘सीओईपी’ माजी विद्यार्थी संघटना आणि ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन समिती यांच्यावतीने विज्ञान साहित्यावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवाद ‘मराठीतील विज्ञान साहित्य: परंपरा, सामाजिक संदर्भ आणि महत्त्व’ या विषयावर होणार असून तो शनिवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे आणि पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोले यांना या परिसंवादात वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हे तिन्ही मान्यवर वक्ते ज्येष्ठ विज्ञान लेखक आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीश पिंपळे हे करणार आहेत. हा कार्यक्रम नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर, शालिमार, नाशिक येथे होणार असून त्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्योत्सव’
रविवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कवयित्री शांताबाई शेळके आणि वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कवितांचा तसेच सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संमेलनपूर्व काव्योत्सव प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमधील प्रसिद्ध कवींच्या सहभागात होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार आहेत. हे दोन्हीही कार्यक्रम ‘महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक’ येथे होणार आहेत.
स्वागत समितीत फक्त ९० सदस्य असल्याने आश्चर्य!
‘भुजबळ नॉलेज सिटी’त दि. ३ ते ५ डिसेंबरला होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. संमेलनाच्या तयारी व नियोजनासाठी मुख्य मानल्या जाणार्या स्वागत समितीत फक्त ९० सदस्यांचा समावेश असल्यामुळे साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. संमेलनातील स्वागत समितीत किमान एक हजार सभासद असावेत, अशी अखिल भारतीय साहित्य मंडळाची भूमिका आहे. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात स्वागत समिती सदस्यांचा हा आकडा हजारांवर गेला होता. साहित्य संमेलनात मोठा खर्च होणार असल्याने आयोजकांनी नाशिकच्या साहित्य संमेलनाचे अंदाजपत्रकच जवळपास चार कोटी असल्याचे सांगितले होते. यावर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टीका करताना स्वागत समितीमधील सदस्य वाढविण्यात यावे, असे म्हटले होते. त्यानंतर आयोजकांकडून स्वागत समिती सदस्य किमान ६५० च्या दरम्यान करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते.