नवी दिल्ली : राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी विरोधी पक्षातील आठ खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित केले आहे. रविवारी कृषि सुधारणा विधेयकावर गोंधळ माजवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. विधेयक मांडत असताना खासदारांनी वेलमध्ये येत घोषणाबाजी केली. उपसभापती हरिवंश कांया माईक तोडण्याचा प्रयत्न केला.
डेरेक ओ’ब्रायन, राजीव सातव, संजय सिंह, केके रागेश, रीपून बोरा, डोला सेन, सय्यद नजीर हुसैन आणि इलामारन करीम आदी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. उपसभापतींशी असंसदीय व्यवहार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नायडू यांनी उपसभापतींवरील कारवाईची मागणी खारीज केली आहे.
कृषी मंत्री यांच्या उत्तरानंतर चर्चेची मागणी करण्यात आली होती. ती नाकारल्याने हरीवंश यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाचे नोटीस पाठवण्यात आली होती. नायडू काल म्हणाले होते की, राज्य सभेत जे काही काल झाले त्याचे समर्थन होऊच शकत नाही. खासदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. उपसभापतींना धमकावले. त्यांच्या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न केला. हे दूर्दैवी आहे, ज्यांच्यावर कारवाई झाली आहे. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.