हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व- ‘कोरोना’ने शिकवलेला धडा व शाश्वत सत्य

    20-Sep-2020
Total Views | 140
Veer Savarkar_1 &nbs
स्वा. सावरकरांचे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हे विचार मनाला पटतात. हिंदूंनी ‘राष्ट्र प्रथम’ मानले. स्वा. सावरकरांचे ‘हिंदुत्व’ हे धार्मिक नव्हते, तर ते राष्ट्रीय होते. त्यांचा सिद्धांत काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे. कोरोनासारख्या राष्ट्रीय संकटात हिंदूंनी देवळे बंद ठेवली. धार्मिक सण-समारंभ थांबवले. देशहित-समाजहिताचा प्रथम विचार केला. आपापल्या मुल्ला-मौलवीची, चर्च मंडळाची मुस्लीम-ख्रिश्चनांप्रमाणे वाट बघितली नाही. कारण, त्यांचा दृष्टिकोन ‘राष्ट्रीय’ होता.
 
 
आपल्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरच हे संकट उभे ठाकले आहे. ‘जनता कर्फ्यू’, ‘संचारबंदी’ यांसारखे उपाय राज्य व केंद्र सरकार योजत आहे. सर्व स्तरातील सर्व नागरिक या सरकारच्या प्रयत्नांना साथ देत आहेत. दुर्दैवाने आपल्या देशांतील मुस्लीम व ख्रिश्चन अल्पसंख्याक, अपवाद वगळता या प्रयत्नांत सहभागी होताना दिसत नाहीत. देशहित वा समाजहितापेक्षा आमचा धर्म, धर्मगुरू व देव श्रेष्ठ आहेत. अशी धर्मांधता हे दोन समाज व त्यांच्यातील धुरीण सर्व क्षेत्रांत दाखवत आहेत. अल्लाहने इराणमधील मुस्लिमांना वाचवले नाही व येशू ख्रिस्ताने युरोपमधील ख्रिस्ती नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून सोडवले नाही, हे विदारक सत्य त्यांच्या पचनी पडत नाही. परंतु, या अंधविश्वासामुळे हे समाज इतरांनाही कोरोनाच्या विळख्यात ढकलत आहेत. सेक्युलर विचारवंत, बुद्धिवादी, पत्रकार, साहित्यिक वगैरे मंडळी या समाजाचे उद्बोधन करण्याऐवजी मूग मिळून बसले आहेत.
 
 
मला वाटते याचे एकमेव कारण म्हणजे, सर्वसाधारणपणे या दोन्ही समाजाकडे राष्ट्रीय वृत्तीचा अभाव आहे. राष्ट्रापेक्षाही त्यांना धर्म श्रेष्ठ वाटतो. म्हणूनच, फादर दिब्रिटोंनी कोरोनाचा कहर झाला असताना “चर्च चालूच राहतील,” असे सांगितले. या फादरना आम्ही त्यांचा धर्म विचारात न घेता ‘मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष निवडले. मूठभर लोकांचा विरोध नजरेआड करून व त्यांनी बहुसंख्य जनतेच्या आरोग्याची व जीवांची पर्वा व करता आपली धर्मांधता जोपासली. हेच लोक, ‘देशात भयाचे व असहिष्णुतेचे वातावरण आहे’ अशी आवई उठवतात व जेव्हा खरोखरच कोरोनासारखे संकट येऊन भयाचे वातावरण असते, तेव्हा “मला काय त्याचे, माझा धर्म महत्त्वाचा!” म्हणून धर्मांधता जोपासतात.
 
 
या कोरोना संकटामुळे त्यांचा पर्दाफाश झाला आहे. ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झाले आहे. अर्थात, या दोन्ही समाजात राष्ट्रीयतेला प्राधान्य देणारे आहेतच; पण अपवादात्मकच व अपवादाने नियम सिद्ध होतो, असे म्हटले आहेच. थोडासा इतिहासाचा मागोवा घेतला तर या दोन्ही समाजांचा स्वातंत्र्यानंतर व सध्या जी मानसिकता दिसते, तिच्याबद्दल आश्चर्य वाटणार नाही. मुस्लीम वा ख्रिश्चन हा प्रथम मुस्लीम वा ख्रिश्चन असतो वा नंतर तो त्या त्या देशाचा नागरिक असतो. जसे मुस्लीम भारतीय, ख्रिश्चन भारतीय. परंंतु, हिंदू हा ‘भारतीय हिंदू’ असतो, याची अनेक प्रमाणे इतिहासात मिळतात, त्याचा थोडक्यात ऊहापोह! अर्थात, येथेही अपवाद आहेतच.
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळच्या सत्ताधार्‍यांनी काही पावले उचलली असती, तर ही भावना या दोन्ही समाजांत रुजली नसती. ‘तुम्हाला भारताचा एक भाग तोडून दिला आहे. तेव्हा भारतात तुम्हाला ‘अल्पसंख्याक’ दर्जा मिळणार नाही. तुम्हाला ‘समान नागरी कायदा’ पाळावा लागेल,’ असे तेव्हाच ठणकावून सांगितले असते, तर कदाचित मुस्लिमांमध्ये एकात्मतेची भावना रुजली असती. पण, इंग्रजीतल्या 'To have the cake & eat it also' प्रमाणे त्यांना दुहेरी फायदा झाला. ख्रिश्चनांनाही अल्पसंख्य दर्जा मिळाल्यामुळे अलगतेची भावना रुजली आणि दुर्देवाने तिला खतपाणी हिंदू नेत्यांनीच घातले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, राजगोपालाचारी यांचे धार्मिक आधारावर फाळणी होणार असल्याने हिंदू-मुसलमानांच्या लोकसंख्येची अदलाबदलच करावी, असे मत होते असे म्हणतात. समान नागरी कायदा करावा, असे बाबासाहेबांना वाटायचे. पण, सत्ताधार्‍यांचा त्याला विरोध होता. मुस्लीम, ख्रिश्चनांना त्यांचे त्यांचे धार्मिक कायदे व हिंदूंना मात्र ‘हिंदू कोड बिल’ हा भेदभाव तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादांनाही मान्य नव्हता. त्यांनी ते बिल नऊ वेळा सरकारकडे पुनर्विचारासाठी पाठवले. अखेर नाराजीने त्यांना सही करावी लागली.
 
मुस्लीम-ख्रिश्चनांना आपण कोणीतरी ‘वेगळे’ आहोत, ही भावना वाढीला राहिली व त्यांच्यात राष्ट्रीय भावना लुप्त झाली. बाबासाहेबांनी अत्यंत समजूतदारपणा व दूरदृष्टी दाखवत ‘हिंदू कोड बिला’त हिंदूंच्या व्याख्येत शीख, जैन, बौद्ध, पारशी आदी धर्म समाविष्ट केले व सर्वांना बिल लागू केले. कोणीच तक्रार केली नाही. म्हणूनच या अल्पसंख्याक समाजांत एकतेची भावना आहे. असे म्हणतात की, बाबासाहेबांनी जेव्हा धर्म बदलायचे ठरवले, तेव्हा ख्रिश्चन व इस्लामी धर्मप्रमुखांनी त्यांना स्वतःच्या धर्मात येण्याविषयी खूप आमिषे दाखवली. परंतु, “मला भारतीय संस्कृतीच्या चौकटीतच धर्मपरिवर्तन करायचे आहे,” असे म्हणत बौद्ध धर्माची- ज्याचा जन्म भारतातच झाला, त्याची बाबासाहेबांनी निवड केली. शीख, जैन व बौद्ध धर्माची मुळेही भारतीय संस्कृतीतच आहेत.
 
मुस्लीम-ख्रिश्चन धर्माचे तसे नाही. त्यांचा उगम व मुळे परदेशात झाली असल्याने त्यांना भारताची सांस्कृतिक परंपरा, येथील ऋषिमुनी व साधुसंत, पूर्वज, येथील अभिमानविषय यांच्याबद्दल प्रेम, आस्था व आपुलकी वाटत नसावी. बाबासाहेबांनी म्हणूनच बौद्ध धर्माची निवड केली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी या देशात ‘समान नागरी कायदा’ असावा, असेही त्यांना वाटायचे. पण, सत्ताधार्‍यांच्या विरोधामुळे ते झाले नाही व ‘समान नागरी कायदा’ हा घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट केला गेला. मतांच्या स्वार्थी राजकारणामुळे ७० वर्षांनंतरही ‘समान नागरी कायदा’ अस्तित्वात आला नाही. वरील विवेचनावरूनच असे वाटायला लागते की, देशावरील कोरोनासारखी आपत्ती या समाजांना देशावरील संकट वाटत नाही; अर्थात हिंदू समाजामध्येही काही अपवाद आढळतातच.
 
 
जानेमाने नट नसिरुद्दिन शहा, ज्यांच्यावर आम्ही त्यांचा धर्म न बघता जीवापाड प्रेम केले, ते तीन खान- आमिर खान, सलमान खान व शाहरूख खान, ज्यांना आम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून भरपूर प्रसिद्धी दिली ते फादर दिब्रिटो व इतर मुस्लीम नेते ओवेसी वगैरे शाहीनबागेतल्या बेकायदेशीर जमावाला (ज्यांच्यामुळे काहींचे प्राण गेले) पांगवण्यासाठी व सध्याच्या कोरोनासारख्या भयानक आपत्तीतही पुढे येत नाहीत. भारतात असहिष्णुता व भय आहे, असुरक्षितता आहे, असे म्हणणारे नसिरुद्दिन शहा त्याचं ‘असुरक्षित’ वातावरणातून मुंबईला हजारो मैलावरून एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला ‘सुरक्षितपणे’ येतात व जातात. त्यांनाही कोरोनाचे संकट हे अल्लामुळे जाईल, असे वाटते काय? देश व समाज जगला तरच तुम्ही तुमची ‘धर्मांधता’ जोपासण्यासाठी तरी जीवंत राहाल, असे त्यांना सांगितले पाहिजे. हिंदूंनी अशी आगळीक केली असती तर?
 
मुस्लीम हा प्रथम मुस्लीम असतो, याचे एक मोठे उदाहरण म्हणजे थोर स्वातंत्र्यसेनानी खान अब्दुल गफार खान. भारताचे तुकडे झाले, तेव्हा खानसाहेब ‘मुस्लीम’ पाकिस्तानात गेले. ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात राहिले नाहीत. याच्या उलट काही वर्षांपूर्वी 60-70च्या दशकात मुंबईत जेव्हा ख्रिश्चनांची ‘युखॅरिस्टिक काँग्रेस’ भरली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी सचिवालयाचा (आताचे मंत्रालय) सहावा पूर्ण मजला त्या परिषदेसाठी दिला होता.
 
आचार्य अत्र्यांनी ‘मराठा’ दैनिकात चव्हाणांना विचारले होते की, “हिंदूंच्या परिषदेला आपण अशीच जागा दिली असती का?” हिंदूंच्या वैचारिक औदार्याचे हे एक उदाहरण! कुल्याब्याला ‘युखॅरिस्टिक काँग्रेस’ बिल्डिंग उभी राहिली. सोनिया गांधी या 16 वर्षांपर्यंत इटालियन पासपोर्टवर लग्नानंतर राहत होत्या. खासदार मधू लिमये यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतरच त्यांनी भारतीय पासपोर्ट घेतला. एका परकीय आक्रमणाच्या वेळी सुरक्षिततेसाठी तर त्यांनी काही दिवस इटालियन वकिलातीत आश्रय घेतला होता; आम्हा भारतीयांना धीर देण्याऐवजी! राष्ट्रीयतेचा अभाव हेच कारण!
 
या सर्व ऐतिहासिक व वर्तमानकाळातील घटना बघता स्वा. सावरकरांचे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हे विचार मनाला पटतात. हिंदूंनी ‘राष्ट्र प्रथम’ मानले. स्वा. सावरकरांचे ‘हिंदुत्व’ हे धार्मिक नव्हते, तर ते राष्ट्रीय होते. त्यांचा सिद्धांत काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे. कोरोनासारख्या राष्ट्रीय संकटात हिंदूंनी देवळे बंद ठेवली. धार्मिक सण-समारंभ थांबवले. देशहित-समाजहिताचा प्रथम विचार केला. आपापल्या मुल्ला-मौलवीची, चर्च मंडळाची मुस्लीम-ख्रिश्चनांप्रमाणे वाट बघितली नाही. कारण, त्यांचा दृष्टिकोन ‘राष्ट्रीय’ होता.
 
‘आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका’ व ज्याला आपल्या समृद्ध संस्कृतीचा व पूर्वजांचा अभिमान आहे तो ‘हिंदू’, ही सावरकरांची सुस्पष्ट भूमिका होती. त्याने कोणतीही पूजापद्धती अवलंबावी, ही त्यांची भूमिका आपण स्वातंत्र्यानंतर व्यवहारात आणली असती, तर ‘हिंदुत्व’ हा या भारतातल्या कोट्यवधी जनतेला जोडणारा दुवा झाला असता, राष्ट्रीय एकात्मता साधली गेली असती. मुस्लीम व ख्रिश्चनांचे नियंत्रण जे सध्या बाहेरील देशांच्या धर्मगुरूंकडून होते, ते भारतातूनच झाले असते. नाहीतरी येथील मुस्लीम-ख्रिश्चन मूळचे हिंदूच ना! अपवाद वगळता!
 
 
अजूनही उशीर झाला असला तरीही ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा स्वा. सावरकरांचा सिद्धांत आपण अंगीकारावा. देशातील धार्मिक तेढ संपवून देश बलवान करण्याचे सामर्थ्य त्यांच्या या सिद्धांतात आहे. कोरोनासारख्या भयानक संकटांतून हाच धडा घ्यायचा आहे. कोरोनाने हाच सिद्धांत अधोरेखित केला आहे.
 
 
- रंगनाथ दीक्षित
अग्रलेख
जरुर वाचा
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण ; मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण ; मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले. आषाढी एकादशी दिवशी रविवार, दि. ६ जुलै रोजी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येईल. या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थान, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121