‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’चे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवरामजी उरांव यांच्या आकस्मिक निधनाने वनवासी, जनजाती समाजाची तसेच ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची कधीही भरुन न येणारी क्षती झाली आहे. त्यांचे जीवनकार्य आणि आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
‘वनवासी कल्याण आश्रमा’ची गंगोत्री असलेल्या जशपूरनगरपासून तीन किमी अंतरावर कुमडो हे जगदेवरामजींचे गाव. आईवडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार. जगदेवरामजींना अगदी लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. तसेच बालपणापासून वाचनाचीही अत्यंत गोडी. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षापासून ते स्वयंसेवक म्हणून संघाशी जोडले गेले. त्यांचे संघाचे तृतीय वर्षही झाले होते. १९६७ साली उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९६८ पासून त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या शाळेत अध्यापनाचे कार्य सुरु केले. १९७१ साली विवेकानंद उच्चतर विद्यालयात ‘शारीरिक शिक्षक’ म्हणून जगदेवरामजी नियुक्त झाले आणि अध्यापन करता करताच त्यांनी आपले एम.ए.चे शिक्षणही पूर्ण केले. जगदेवरामजी ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे एक सुपरिचित कार्यकर्ते तर होतेच. पण, आणीबाणीच्या काळात सहा महिने ‘मीसा’अंतर्गत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
१९६८ सालापासून ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक-अध्यक्ष असलेल्या श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांच्या घरात जगदेवरामजी जणू एक सदस्यासारखेच होते. ते आईंना (श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांच्या पत्नी - प्रभावती देशपांडे) सांगायचे, “आई, आज मला खूप भूक लागली आहे. जेवायला वाढ.” श्रद्धेय बाळासाहेबांची कन्या श्रीमती शोभाताई सांगतात की, “मी तेव्हा खूप लहान होते. पण, मला उठायला जरी उशीर झाला, तरी जगदेवरामजी माझ्या डोक्याला तेल लावायचे. माझे केस विंचरायचे व मला शाळेतही पोहोचवायचे. इतका स्नेह जगदेवभैय्या यांचा आम्हा भावंडांना मिळाला आहे.” एकप्रकारे जगदेवरामजी हे श्रद्धेय बाळासाहेबांचे अभिन्न अंगच होते. त्यांची संपूर्ण जडणघडण श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांच्या सान्निध्यात झाल्यामुळे जगदेवरामजींचे व्यक्तिमत्त्वही अगदी बाळासाहेबांसारखेच घडले. जगदेवरामजींचा स्वभावही अत्यंत विनम्र, हसतमुख, निरहंकारी आणि प्रेमळ होता. श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांनी सांगितलेले कोणतेही कार्य का असेना, जगदेवरामजींनी ते पूर्ण केले नाही, असे कधीही घडले नाही. त्यांना प्रवासात बाळासाहेबांचे धोतर धुवायलाही मनापासून आवडायचे. जशपूरनगरला दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. २०१७ साली मला त्यांनी गणपती अथर्वशीर्षाची २५० पुस्तके पुण्याहून पाठवायला सांगितली होती. त्या माध्यमातून त्यांनी तेथील मुलांना अथर्वशीर्ष शिकवण्याची व्यवस्था केली व अथर्वशीर्षाचे मुलांकडून सामूहिक पठनही करून घेतले.
खरं तर धार्मिक ग्रंथांचे जगदेवरामजी मोठ्या आवडीने वाचन करायचे. हिंदीबरोबरच मराठी भाषाही त्यांना व्यवस्थित समजायची आणि त्यामुळे चांगली पुस्तके, तसेच ऐतिहासिक, धार्मिक, मराठी अंकही आवर्जून वाचण्याची एकही संधी ते दवडत नसत.
जगदेवरामजींचा पिंड पाहाता, त्यांचे नोकरीत लक्ष लागणे तसे कठीणच होते. म्हणूनच मग पुढे १९७८ साली ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने अखिल भारतीय स्वरूप धारण केल्यानंतर जगदेवरामजी सदैव बाळासाहेबांबरोबर देशभरातील प्रत्येक प्रवासात अगदी सावलीसारखे सोबतीला असत. खरं तर ‘कार्यकर्ता विकास’ ही महत्त्वपूर्ण विकासाचीच ती प्रक्रिया होती. १९८५ पासून जगदेवरामजींकडे ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे अखिल भारतीय उपाध्यक्ष हे दायित्व होते. पुढे श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांचे स्वास्थ्य फारसे ठीक नसायचे. म्हणूनच मग १९९३च्या ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’च्या कटक संमेलनात ‘कार्यकारी अध्यक्ष’ म्हणून जगदेवरामजींची निवड करण्यात आली. श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांच्या निधनानंतर १९९५ पासून ‘वनवासी कल्याण आश्रमाचे’चे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून जगदेवरामजींनी ही जबाबदारी इतकी वर्षं लीलया सांभाळली.
त्यानंतर ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या ‘खेलकुद आयामा’च्या दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर खेल प्रतियोगिता सुरु झाल्या. रचनात्मक कामांबरोबरच वनवासी क्षेत्रात वनवासी बंधूंच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ‘हितरक्षा आयाम’ही सुरु झाला. अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने छेडली गेली. तहसीलदार ते पंतप्रधान, राष्ट्रपती यांना निवेदने देणे, प्रत्यक्ष भेटीगाठींमध्येही जगदेवरामजी अगदी सक्रिय आणि कार्यतत्पर होते. उत्तर पूर्वांचलमध्ये ‘धर्मसंस्कृती मंचा’च्या स्थापनेच्या माध्यमातून आश्रमाचा कार्यविस्तार झाला खरा. पण, सेवाकार्य तसेच वनवासी क्षेत्रात कित्येकदा हितरक्षणासाठी जगदेवरामजींना संघर्षाचा पवित्राही स्वीकारावा लागला.
‘वनवासी कल्याण आश्रमा’चे ‘तू-मैं एक रक्त’ हे ब्रीदवाक्य. त्याचा आदर्श घेत, वनवासी क्षेत्रात कार्य करण्यासाठी नगरीय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्तरावर काम करु लागले.
वनवासींबद्दल जगदेवरामजी सांगायचे की, “वनवासी क्षेत्रातील ही मंडळी फार भोळी आहेत. सभोवतालच्या जगाची त्यांना नीटशी माहितीही नाही. ते दारिद्य्राने गांजलेले आहेत. त्यांच्या अज्ञानाचा, भोळेपणाचा व गरिबीचा लाभ घेऊन, त्यांना धर्मच्युत, राष्ट्रीयत्व नष्ट करण्याचे अनेकांचे प्रयत्न चालू असतात. अशा गोष्टींना पायबंद घालून दूर गेलेल्यांना पुनरपि आपल्या समाजात समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने म्हणजे स्वसमाज, स्वधर्म यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने नगरीय बंधूंनी वनवासी क्षेत्रात कार्यविस्तार करण्यात योगदान देण्याची आवश्यकता आहे.”
असे हे सर्वांचे लाडके, काळजी वाहणारे जगदेवरामजी अगदी छोटी छोटी उदाहरणे देऊन एखादा अवघड विषयही चटकन समजावून सांगायचे. वनवासी क्षेत्रातील मंडळींना बैठकीसाठी बोलवल्यावर ‘अपेक्षित तेच उपस्थित’ ही पद्धत. सुरुवातीला गावातले केवळ दोन-तीन जण बैठकांना येत असत. हळूहळू मग जो बैठकीला अपेक्षित तोच येई. पण, छोट्या गावांतील या वनवासींच्या मनात काही प्रश्नं असतात. त्यामुळे फक्त दोन-तीन जण बैठकीसाठी पुढे येतात. पण, आपली ही पद्धती हळूहळू विकसित होईल. स्नेहबंध वृद्धिंगत होण्यासाठी त्यांना विश्वास वाटावा, यासाठी आत्मीयता वाढण्यासाठी रक्षाबंधन, वनयात्रा अशा कार्यक्रमांमधून वनक्षेत्रात येणे-जाणे केले पाहिजे. प्रेमभावना मनात ठेवून आपण संबंध विकसित करु शकतो, या मताचे जगदेवरामजी होते. त्यांनी त्याचे स्वत:ही पालन केले आणि कार्यकर्त्यांकडूनही तशीच अपेक्षा ठेवली.
‘वनवासी कल्याण आश्रमा’ची स्थापना ‘छात्रावास’ प्रकल्पाने झाली. त्याला ‘कार्यकर्ता निर्माण केंद्र’ असे श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे म्हणायचे. त्यामुळे जगदेवरामजींना ‘छात्रावास’ प्रकल्पाच्या कार्यक्रमात उपस्थित राहायला आवडायचे. २००५ साली जशपूरनगर येथे अखिल भारतीय छात्रावास स्तरावर छात्रावास अधीक्षकांचा वर्ग आयोजित करण्यात आला होता. “मी पूर्णवेळ १२ दिवस वर्गात राहीन,” असे जगदेवरामजी मला म्हणाले. त्यामुळे त्यांचे अनौपचारिक व औपचारिक असे मार्गदर्शन वसतिगृह प्रमुखांना लाभले. दादरा-नगर हवेलीतील खानवेल व मोटारांधा येथील विद्यार्थ्यांच्या १५ दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या समापन कार्यक्रमाची सीडी मोठ्या पडद्यावर दाखवली, तेव्हा ती बघून जगदेवरामजींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, “आपली वनवासी मुले दीड तास वैविध्यपूर्ण शारीरिक, सांस्कृतिक कार्यक्रम किती प्रभावीपणे करु शकतात, हे या निमित्ताने बघायला मिळाले.” अशा या जगदेवरामजींना शारीरिक कार्यक्रम खूप आवडायचे.
सर्व कार्यकर्त्यांशी अगदी आपुलकीचे संबंध, निरहंकारी वृत्ती आणि सादगीपूर्ण राहणी हे जगदेवरामजींच्या जीवनशैलीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कार्यकर्त्यांना ते आपण अमूक एक गोष्ट अशाप्रकारेही करु शकतो, असे अगदी मनमोकळे सल्लेही द्यायचे.
श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांचे प्रदीर्घ सान्निध्य, मार्गदर्शन लाभल्यामुळे ते बाळासाहेबांची उदाहरणे देऊन बरेचदा अनेक गोष्टी समजावून सांगत. असेच एक उदाहरण म्हणजे, चर्चने एकदा आत्मपरीक्षण करायचे ठरविले की, भारतातील वनक्षेत्रात आपण इतकी धनशक्ती, मनुष्यबळ, साधनसंपत्ती वापरतो, पण आवश्यक तो परिणाम आपल्याला का मिळत नाही? याचे नेमके काय कारण असावे? म्हणून त्यांनी सर्व्हेही केला. त्यावर बोलताना श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे म्हणाले होते, “एक बाबा धुनी पेटवून बसतो. त्याचेकडे सगळे आकर्षित होतात व आपला धर्मपरिवर्तनाचा सगळा खेळ फसतो.”
वनवासी बंधू धर्मप्रिय आहेत. स्वाभिमानी आहेत. धर्मपरिवर्तन त्यांना पसंत नाही. आपल्या स्वधर्मावर त्यांची अपार निष्ठा आहे. म्हणून जशपूरनगरला साधुसंतांचे गावागावांत भ्रमण, रामायण, महाभारत कथा, यज्ञ, सहभोजन असे अनेक कार्यक्रम संपन्न झाले. जगदेवरामजींच्या मार्गदर्शनात शबरीकुंभ, झाबुआ विशाल हिंदू संमेलन, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा, उज्जैन कुंभ असे मोठे कार्यक्रम आयोजित केले गेले.
जगदेवरामजींनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वाटेवर वनवासी कल्याण आश्रम उत्तरोत्तर प्रगतीशील राहाणारच आहे. अशा या भारतमातेच्या वीरपुत्राने, कर्मयोग्याने, जशपूरनगरला कर्मभूमीत १५ जुलै रोजी वैकुंठाला प्रस्थान केले. श्रद्धासुमन अर्पण करून, त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना.
- सुहास पाठक
(लेखक वनवासी कल्याण आश्रमाचे पश्चिम क्षेत्र छात्रावास प्रमुख आहेत.)