काँग्रेसने साठ वर्षे ‘रिव्हर्स भुदान चळवळ’ चालवली- राम माधव
नवी दिल्ली: विनोबा भावे यांनी देशातील गरजूंना कसण्यासाठी जमीन मिळावी यासाठी भुदान चळवळ चालवली होती. मात्र, काँग्रेसने साठ वर्षे पाकिस्तान आणि चीनला जमीन देण्याची ‘रिव्हर्स भुदान चळवळ’ चालवली होती. त्यामुळे चीनच्या विस्तारवादास चोख प्रत्युत्तर देणाऱ्या मोदी सरकारला प्रश्न विचारण्याचा काँग्रेसला हक्क नाही, असा टोला भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक राम माधव यांनी बुधवारी लगावला.
ऑर्गनायझर साप्ताहिकाने भारत – चीन सीमाप्रश्नावर वेबिनारचे आयोजन केले होते. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख रामलाल आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी विषयावर मते मांडली. निवृत्त सैन्याधिकाऱ्यांनीही वेबिनारमध्ये सहभाग घेतला होता.
भारतास शांतता हवी आहे, मात्र त्यासाठी सार्वभौमत्वासोबत तडजोड होणार नाही, असा स्पष्ट संदेश चीनला देण्यात आला आहे. चीनचा शांतेतचा बुरखा पांघरलेला विस्तारवाद वेळीच ओळखून त्यास छेद देण्याचे काम करण्यात आले आहे. सीमेबद्दलचे भारतीय दावे ठोसपणे मांडणे, राजनैतिक चर्चेसोबतच लष्करी कारवाई करण्यास न कचरणे, एलएसीवर चीनतर्फे होणाऱ्या बांधकामास, आगळीकीस ठोस विरोध करणे याद्वारे भारत माघार घेणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चीनसोबत छुपे समझोते करणाऱ्यांनी मोदी सरकारवर टिका करणे हास्यास्पद आहे. विनोबा भावे यांनी देशातील गरजूंना कसण्यासाठी जमीन मिळावी यासाठी भुदान चळवळ चालवली होती. मात्र, काँग्रेसने साठ वर्षे पाकिस्तान आणि चीनला जमीन देण्याची ‘रिव्हर्स भुदान चळवळ’ चालवली होती, त्यामुळे मोदी सरकारला प्रश्न विचारण्याचा त्यांना हक्क नसल्याचा टोला राम माधव यांनी लगाविला.
भारताला गेल्या सात दशकांपासून पाकिस्तान आणि चीन दोन्ही शेजारी देशांची नेहमीच डोकेदुखी राहिलेली आहे. त्यापैकी पाकिस्तान थेट संघर्षाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देणे तुलनेने सोपे आहे. मात्र, चीनसोबत तसे नाही. कारण चीनसोबत भारताची सीमारेषा निश्चित नाही, कारण तसे करणे चीन नेहमीच टाळत आला आहे. त्याचप्रमाणे अन्य देशांच्या भूमीवर हळुहळू अतिक्रमण करून ती बळकावणे, हे चीनचे धोरण आहे. अगदी शांतपणे चीन आपले ते धोरण राबवित आला आहे. चीनच्या या रणनितीकडे यापूर्वीच्या भारतीय नेतृत्वाने सातत्याने दुर्लक्ष केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे मनसुबे ओळखून त्यास पायबंद घातल्यानेच आजची संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचेही राम माधव म्हणाले.
चीनच्या इशाऱ्यावर नाचणारे सैन्याचे मनोबल खच्ची करत आहेत- रामलाल
भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला संघर्ष हा दोन्ही देशांमधला अथवा जनतेमधील संघर्ष नसून डावा विचार (कम्युनिझम) आणि लोकशाही या दोन विचारसरणींमधला संघर्ष आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी डावा विचार सत्तेत आहे, तेथे तेथे विस्तारवादाचा सामना करावा लागतो. आक्रमकता हा डाव्या विचाराचा स्थायीभाव आहे, असे मत रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख रामलाल यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे चीनच्या इशाऱ्यावर नाचणे काही घटक देशात कार्यरत आहेत. भारतीय सैन्याचे मनोबल खच्ची करणे हेच त्यांचे काम असल्याची टिकाही त्यांनी काँग्रेसचे नाव घेता केली.