‘कोरोना’मुळे जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2020   
Total Views |
CORONA_1  H x W
 
 
 
 
कोरोना हा पूर्वनियोजित कट असल्यासारखा प्रगत व जागतिक पातळीवर प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांतच फार मोठ्या प्रमाणावर प्रकर्षाने दिसून आला. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळ्या झाल्या आहेत. जागतिक प्रचंड मंदीचे चटके बसू लागले आहेत व भविष्यात अर्थव्यवस्थांवरील हे संकट अधिक दाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
चीनमधून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आशिया खंडातील चीनच्या जवळच्या भारत, पाकिस्तान, जपान वगैरे देशांतही कोरोनाने हातपाय पसरले.ऑस्ट्रेलिया खंडात तो पोहोचला नाही. अमेरिका खंडातही कोरोनाने अक्षरश: थैमान घातले, पण बाजूचा कॅनडा तुलनेने सुरक्षित राहिला. आफ्रिका खंडातल्या तुरळक देशांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला, पण युरोप खंडातील कित्येक देशांत त्याने धुमाकूळच घातला. कोरोना हा पूर्वनियोजित कट असल्यासारखा प्रगत व जागतिक पातळीवर प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांतच फार मोठ्या प्रमाणावर प्रकर्षाने दिसून आला. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळ्या झाल्या आहेत. जागतिक प्रचंड मंदीचे चटके बसू लागले आहेत व भविष्यात अर्थव्यवस्थांवरील हे संकट अधिक दाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
 
कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था चालू वर्षी एक टक्क्याने आक्रसली जाईल. मूळ अंदाज अडीच टक्के वाढीचा होता. मात्र, महामारी बरेच महिने राहिली, तर निर्बंध सुरुच ठेवावे लागतील. परिणामी, जागतिक अर्थव्यवस्था आणखी आक्रसेल, असा होरा ‘युनायटेड नेशन्स’ (युनो)च्या आर्थिक व सामाजिक विभागाने व्यक्त केला आहे. जगातील दोनशेपेक्षा जास्त देशांत कोरोनाचा संसर्ग झाला असून, लाखो लोकांना त्याची बाधा झाली आहे, तर हजारोंचे मृत्यू झाले आहेत. शंभरहून अधिक देशांनी गेला महिनाभर आपल्या राष्ट्रीय सीमा बंद केल्या असून, त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. विविध देशांच्या सरकारांनी त्यांच्या जनतेला आर्थिक आधार दिला नाही, तर लोकांना रोजचा खर्च करणेही कठीण होईल व अशा देशांमध्ये अनागोंदी माजेल. कोरोनाचा आर्थिक बाजूने जसा विचार व्हायला हवा, तसा सामाजिक बाजूनेही विचार व्हायला हवा. मार्च महिन्यापासून जग आर्थिक घसरणीकडून तीव्र आर्थिक मंदीच्या दिशेने फरफटत चालले आहे. अमेरिकेतून बाहेरील देशांमध्ये होणार्‍या जहाज वाहतुकीत मार्चमध्ये निम्म्याने घट झाली. येथील नांगरून ठेवलेल्या जहाजांवरून ज्या वेगवेगळ्या वाहनांची वाहतूक केली जायची, त्यात ८० टक्क्यांची घट नोेंदवण्यात आली आहे.
 
 
 
 
जर्मनीत मार्च महिन्यात नवीन कार नोंदणी मोठ्या प्रमाणात होत असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण ३६ टक्क्यांवर आले आहे, तर ब्रिटनमध्ये या नोंदणीत ४४ टक्क्यांची घसरण झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या अशा तीन अरब अर्थव्यवस्था कोसळल्या आहेत. ब्राझीलमधील सेवा उद्योगाने गेल्या चार वर्षांमध्ये गाठला नव्हता, एवढा तळ गाठला. दक्षिण आफ्रिकेतील वाहनविक्रीत ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियात गेल्या तीन दशकांमध्ये मंदीची पडछाया पडली नव्हती. परंतु, आता ऑस्ट्रेलियात नोकर्‍या उपलब्ध नाहीत, ही भारतीय तरुणांसाठी दुःखद बातमी आहे. अमेरिकेनेही ‘नॉन-अमेरिकन’ना यापुढे काही काळ नोकर्‍या देणार नाही, असे जाहीर केले आहे. अमेरिकेचा विचार केला तर तेथे ‘अति तेथे माती’ झालेली आहे. २००८-२००९च्या जागतिक मंदीपेक्षाही यावेळची परिस्थिती भयाण आहे. कारण, जागतिक पुरवठा साखळी किंवा ‘ग्लोबल सप्लाय चेन’ विस्कळीत झाली आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. ‘एअर बस’सारख्या महाकाय कंपनीने आपल्या लाखो कामगारांना धोक्याची घंटा दाखविली आहे. या महामारीमुळे बहुतेक देशांमध्ये नवे रोजगार तर नजीकच्या भविष्यात निर्माण होणे अशक्य आहेच. पण आहे त्या लोकांचे रोजगार तरी टिकतील का, ही शंका अर्थतज्ज्ञांकडून उपस्थितीत केली जात आहे.आपला देश एवढे वर्ष ‘तरुणांचा देश’ म्हणून ओळखला जात होतो. पण आता मात्र बेकारीमुळे याच तरुणांच्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे.
 
 
 
त्यातच अनेक देशांमध्ये मे किंवा जूनपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढण्याचीही शक्यता असून यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात दोन टक्क्यांनी तरी घट अपेक्षित आहे. ‘होंडा मोटार’ कंपनीने अमेरिकेतल्या आपल्या दहा कारखान्यांतील तात्पुरता ‘ले ऑफ’ दिलेल्या आपल्या कामगारांना आता पुढील एक-दोन महिने पगार देता येणार नसल्याचे कळविले आहे. ही परिस्थिती सार्वत्रिक होणार असून यासाठी सर्व बाधित देशांनी व तेथील नागरिकांनी पुढील आर्थिक दोन-तीन वर्षे आर्थिक शिस्त पाळावयास हवी. कोरोनाला लवकर आळा न बसल्यास, जगभरातील किमान अडीच कोटी लोकांच्या नोकर्‍या जातील, असा इशारा आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या महासंचालकांनी दिला आहे. एकीकडे कोरोनापासून लोकांचा बचाव करताना अर्थचक्रही चालू ठेवावे लागणार आहे, हे ज्या देशाच्या राज्यकर्त्यांना जमेल ते देश आर्थिक मंदीच्या विळख्यातून बाहेर येतील. सर्व देशातील राज्यकर्त्यांना उत्पादितेर खर्च बंद करावे लागतील. पुतळे, स्मारके वगैरे पुढील १० वर्षे तरी बांधण्याच्या भानगडी कोेणत्याही सरकारने करु नये, जेणेकरुन आरोग्य सेवासारख्या आजवर दुर्लक्षित राहिलेल्या क्षेत्राकडे सरकारला आर्थिक लक्ष केंद्रीत करता येईल.
 
 
आरोग्य यंत्रणाला आव्हान
 
कोरोनामुळे अमेरिकेसह अनेक विकसित देशांच्या आरोग्य यंत्रणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संकटाशी सामना करीत असताना ‘लॉकडाऊन’मुळे बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्था ढासळत चालल्या आहेत. जगातील काही देश गरिबी, गृहयुद्ध, निर्वासितांचे लोंढे (जसे आपल्या देशात बांगलादेशींचे) आदी समस्यांमुळे बेजार झाले आहेत. मात्र, दक्षिण सुदान, मेमेन, सीरिया, व्हेनेझुएला या चार देशांमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. या देशांत कोरोनाचा संसर्ग वाढल्यास भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा ‘इंटरनॅशनल रेस्क्यु कमिटी’ या जागतिक संघटनेने दिला आहे. याशिवाय बांगलादेश, ग्रीस, सीरिया या देशांतील निर्वासित कोरोनाचे मोठे वाहक ठरू शकतात, असेही अहवालात म्हटले आहे.
 
 
 
जागतिक उत्पन्नात दक्षिण सुदान, येमेन, सीरिया, व्हेनेझुएला या चार देशांचा एकत्रिक वाटा केवळ ०.६ टक्के इतका आहे. मात्र, जागतिक ३० टक्के लोकसंख्या या चार देशांमध्ये राहते. कोरोनाचा मुकाबला करण्याची क्षमता या देशांमध्ये नाही. याशिवाय बुर्किना फासो, सीरिया, सोमालिया या गरीब देशांमध्येही आरोग्य यंत्रणा विस्कळीत असून त्यांना कोरोनाचा मोठा धोका आहे. सीरिया, ग्रीस, बांगलादेशातील निर्वासितांसाठी उभारलेल्या शिबिरांत लाखो लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे या भागात कोरोना पसरल्यास संसर्गाचे प्रमाण वुहानपेक्षा चार पट अधिक असेल. त्यामुळे या देशांतील लोकांना डोळ्यात तेल घालून इतर देशातील लोकांनी सांभाळले पाहिजे, नाहीतर मानवाच्या मृत्यूच्या प्रमाणात फार मोठी वाढ होईलच, पण जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली व जागतिक अर्थव्यवस्थांचे एवढे नुकसान होईल की यातून यादवी निर्माण होईल.
 
 
कोरोना संसर्गामुळे जगभरातील फुलबाजार कोमेजला असून या क्षेत्राचे कधीही भरुन न येणारे सुमारे ८.५ अब्ज अमेरिकी डॉलर नुकसान होऊ घातले आहे. जगात नेदरलँड्स, केनिया, इथिओपिया हे देश फूल उत्पादनात आघाडीवर आहेत. फुलांची सर्वांत मोठी बाजारपेठ युरोपीय देश असून या देशांतच कोरोनाने हाहाकार माजविल्यामुळे, फुलांची निर्यात ठप्प झाली आहे. फुलांची तोडणी आणि छाटणी करणार्‍या कर्मचार्‍यांना घरी पाठविण्यात आले आहे. नेदरलँड्सचे ‘अल्समीर ऑक्शन हाऊस’ ओस पडले आहे. या लिलाव केंद्रावर दररोज १२ अब्ज फुलाचा लिलाव होतो. मात्र, कोरोनामुळे हॉलंडचे व काश्मीरचे ‘ट्युलिप’ कोमेजले आहे. युरोपीय देशात कोरोनामुळे वाहतूक ठप्प आहे. विमान सेवा बंद राहिल्याने आयात-निर्यातीवर परिणाम झाले आहेत. देशांच्या सीमा बंद केल्याने स्थानिक बाजारपेठांवरही परिणाम झाला आहे. युरोपीय संघातील देशांबरोबरच अमेरिका, आखात, भारत, जपान येथेही कोरोनाचा प्रसार झाल्याने फुलांची निर्यात थंडावली आहे.
 
 
 
 
विषाणू संसर्गामुळे जागतिक व्यापार ठप्प झाला असून विविध देशांनी व्यापारांवर घातलेले निर्बंध हे सर्वांसाठी घातक ठरु शकतात. यामुळे काही देशांत साठेबाजी वाढेल, तर काही देशांवर उपासमारीची वेळ येईल. सर्वात कमी परकीय चलनसाठा असणारे झिम्बाब्वे आखातातील देश येमेन, लेबनॉन आणि सीरियातील संघर्ष आणखी तीव्र होईल. कोरोनाच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी ‘डब्ल्यूएफपी’ने वैश्विक मानवतावादी आराखडा तयार केला असून यासाठी ३५० दशलक्ष अमेरिकी डॉलरचा निधी संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा या संकटातून बाहेर पडण्यासाठी १२ अब्ज अमेरिकन डॉलर एवढा निधी लागेल. वैश्विक आपत्कालीन यंत्रणेला कार्यान्वित करण्यासाठी एवढा निधी गरजेचा आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जागतिक अर्थचक्र तर ठप्प झालेच आहे, पण त्याचबरोबर याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसत असल्याने, जागतिक भूकबळी वाढतील. या वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील एक चतुर्थांश लोकांच्या तोंडचा घास हिरावला जाणार असल्याचे ‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’कडून सांगण्यात आले आहे. ५५ देशांतील १३५ दशलक्ष लोकांची रोजीरोटी धोक्यात येईल. २६५ दशलक्ष लोकांना धोका पोहोचण्याचा संभव आहे. आफ्रिका व मध्यपूर्वेतील देशांमध्ये संघर्ष होतील, तर उत्तर नायजेरिया, दक्षिण सुदान, सीरिया व येमेन हे देश जीवघेण्या स्थितीत असतील. ‘ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस २०२०’ या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. देवाच्या कृपेने या देशांच्या तुलनेत आपल्या देशाची स्थिती इतकी भीषण स्वरुप धारण करण्याची शक्यता नाहीच.
 
 
 
जगात आजपर्यंत पुरेसे अन्नधान्य उपलब्ध आहे. परंतु, गरजू देश आणि लोकांपर्यंत त्यांचे वितरण करण्याचा मुद्दा गंभीर आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य (यापुढे याला फार महत्त्व आहे.) खुला बाजार आणि पुरवठा साखळी याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य अरिष्टाचे रुपांतर अन्नधान्य संकटात होईल, असा हा इशारा युनोच्या ‘एफएओ’ संघटनेने दिला आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये जगातील सुमारे १३५ दशलक्ष लोकांना अन्नसुरक्षेच्या संकटाला सामोरे जावे लागत होते. पण, आता कोरोनामुळे १८३ दशलक्ष लोकांना अन्न अन्न करावे लागेल. कोरोनाचे निर्मूलन कधी होईल, याचे उत्तर आज जगात कोणाकडेच नाही. पण, जेव्हा केव्हा होईल तेव्हा जशी दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या देशांनी उभारी घेतली होती, (उत्तम उदाहरण जपान) तशी सर्व बाधित देशांना त्यांच्या त्यांच्या सामाजिक व आर्थिक गरजा वाहून उभारी घ्यावी लागेल. पण, सर्व देशांसाठी सर्वांना अन्न, औद्योगिक प्रगती, हातांना काम व मजबूत आरोग्य यंत्रणा या बाबींना महत्त्व द्यावे लागेल, हे निश्चित!|



 
@@AUTHORINFO_V1@@