टिटवाळा : कल्याण तालुक्यातील-मुरबाड रोडवरील रायता पुलानजीक धुळवडीचा रंग काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदी पत्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून कल्याण तालुका पोलीस घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा करीत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
धुळीवड खेळून झाल्यानंर अंगावरील धुळवडीचा रंग काढण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या हरेश डिंग्रां (३६,रा. उल्हासनगर) या तरुणाचा मुरबाड रोड वरील रायता पुलानजीक असलेल्या उल्हास नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
होळीचा आनंद साजरा करून दुपारी धुळवडीचा रंग काढण्यासाठी तीन मित्रांसोबत उल्हास नदीवर आंघोळीसाठी उतरला असताना रायता पुलानजीक नदीच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यत त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरून त्याचा दुर्दैवी अंत झाला होता. उत्तरणीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्याचा मृतदेह पाठवण्यात आला असून कल्याण तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबात अधिक तपास पोलीस उपनिरक्षक बजरंग रजपूत करीत आहेत.