तामिळनाडू : सुपरस्टार रजनीकांत येत्या काळात सक्रीय राजकारणात पदार्पण करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. किंबहुना याबाबत खुद्द रजनीकांत यांनीही संकेत दिले होते. मात्र यादरम्यानच रजनीकांत यांनी मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आपण राजकारणात एन्ट्री करणार नसल्याची घोषणा रजनीकांत यांनी केली आहे. तसंच कोणत्याही राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे रजनीकांत यांनी जाहीर केले आहे. एएनआयकडून तशी माहिती देण्यात आली आहे.
‘राजकारणात प्रवेश नाही पण लोकांसाठी काम सुरुच’
सुपरस्टार रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिले आहे. असे असले तरी रजनीकांत यांनी अजून एक महत्वाची घोषणा केलीय. आपण राजकारणातप्रवेश करणार नसलो तरी लोकांसाठी काम करत राहणार असल्याचे ते म्हणाले. रजनीकांत यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, ३१ डिसेंबरला आपण नव्या पक्षाची घोषणा करु. त्यामुळे आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत रजनीकांत उतरणार हे नक्की मानले जात होते.तसेच रजनीकांत हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आज रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये लिहिलेलं, 'अतीव जड अंत:करणाने मी सांगू इच्छितो की, मी राजकारणात प्रवेश करु शकत नाही. हा निर्णय आणि त्याबाबतची माहिती देणं किती वेदनादायक आहे हे माझ्याहून चांगलं कोणीच जाणत नाही. राजकारणात प्रवेश न करताच मी जनतेची सेवा करणार आहे.आपल्या या निर्णामुळं चाहते आणि समर्थकांची निराशा झालीच असेल', त्याबाबत या महान अभिनेत्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे. दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकांपूर्वी पाच महिन्यांआधीच रजनीकांत त्यांच्या राजकीय पक्षाची स्थापना करत सक्रिय राजकाराणात येण्याची चिन्हं होती. पण तूर्तास तरी त्यांनी या निर्णयातून माघार घेतली आहे.