आनंदवार्ता : लोणार सरोवर 'रामसर' स्थळ म्हणून घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2020
Total Views |
ramsar_1  H x W


पाणथळ जागेची आंतरराष्ट्रीय मान्यता

मुंबई (अक्षय मांडवकर) - बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराला 'रामसर' स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. 'रामसर'च्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून वन विभागानेही याला दुजोरा दिला आहे. जगातील जैवविविधतेने महत्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय 'रामसर' स्थळाचा दर्जा देण्यात येतो. लोणार अभयारण्य हे महाराष्ट्रातून घोषित झालेले दुसरे 'रामसर' स्थळ आहे.
 
 
 
 

नाशिकमधील नांदूरमधमेश्वर अभयारण्याच्या रुपाने या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्राला पहिले 'रामसर' स्थळ मिळाले होते. आज हा दर्जा लोणार सरोवराला मिळाला आहे. याविषयी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर यांनी सांगितले की, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रायलाने लोणार सरोवराला 'रामसर'चा दर्जा दिल्याची माहिती आम्हाला दिली आहे. 'रामसर'च्या संकेतस्थळावरही यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात 'रामसर'चे प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त होईल. लोणार सरोवराच्या संवर्धनाच्या दृष्टीने राज्यासाठी ही अभिमानाची बाब असून यामुळे लोणारच्या संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे. लोणार सरोवर हे भारतातील ४१ वे 'रामसर' स्थळ आहे. 
 
 
 
लोणार सरोवर हे बेसाॅल्ट खडकावर उल्कापाताने तयार झालेले जगातील एकमेव सरोवर आहे. यामधील पाणी अल्कधर्मी असून हे सरोवर १३७ मीटर खोल आणि १.८ किमी रुंद आहे. सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. हे सरोवर अतिवेगवाने भूभागावर आदळलेल्या उल्केमुळे तयार झाले आहे. त्याच्या निर्माणाच्या वर्षाबाबत बरेच अंदाज आहेत. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरुन काढलेले वय अंदाजे ५२ हजार वर्ष आहे. तर अलीकडील अरगाॅन डेटिंग वापरुन काढलेले वय ५ लाख ४७ हजार वर्षांचे आहे. हे सरोवर आणि त्याच्या आसपासच्या परिसराला अभयारण्याचा दर्जा असून आता 'रामसर'चा दर्जा प्राप्त झाल्याने या स्थळाच्या पर्यटकीय व अन्य विकासास प्राधान्य मिळणार असल्याचे काकोडकर यांनी सांगतिले. आजबाजू्च्या वस्त्यांमधून या सरोवरात सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे येथील प्रदूषणाचा मुद्दा अधोरेखित करुन मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील खटला सुरू आहे. सांडपाण्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आता 'रामसर' स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्याने या समस्येचे निराकरण लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. भविष्यात या जागेचे संवर्धन योग्य पद्धतीने न झाल्याचे 'रामसर' प्रमाणपत्र रद्द देखील होऊ शकते.
 
 
 
रामसर म्हणजे काय ? 
१९७१ साली इराणमधील ’रामसर’ शहरात ‘रामसर परिषद’ पार पडली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. यासाठी पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा करण्यात आला. भारताने ’रामसर’ करारावर १९८२ साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील २,४१० पाणथळींना ’रामसर’चा दर्जा प्राप्त आहे. आजवर भारतातील ४१ पाणथळींना ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे. 
 
 

@@AUTHORINFO_V1@@