मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसागणिक वाढत आहे. अशा परिस्थितीत वन विभाग वन्यजीवांमुळे होणाऱ्या नुकसानभारपाईसाठी कोट्यावधी रुपये मोजत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे (Wildlife attack compensation). वन विभागाने गेल्या पाच वर्षात सर्वाधिक नुकसान भरपाई २०२४-२५ या सालात दिली असून ती २२० कोटी रुपये एवढी आहे (Wildlife attack compensation). त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या वेळीच शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. (Wildlife attack compensation)
राज्यात वाघ, बिबट आणि तृणभक्षी प्राण्यांमुळे मानव-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य मृत्यू, पशुधन हानी आणि शेतपिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत वन विभागाकडून या प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई दिली जाते. गेल्या पाच वर्षांमध्ये नुकसान भरपाईच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. यासंबंधीची आकडेवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी विधीमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पटलावर मांडली. राज्यात वन्यजीवांमुळे झालेल्या नुकसान भरपाई २०२०-२१ मध्ये ४४ हजार ६९२, २०२१-२२ मध्ये ४७ हजार २८३, २०२२-२३ मध्ये ५४ हजार ५८८, २०२३-२४ मध्ये २ लाख ३७ हजार ८४१ आणि २०२४-२५ मध्ये १ लाख ८६ हजार ४६ प्रकरणे नोंदविण्यात आली.
या प्रकरणांमध्ये २०२०-२१ मध्ये ८० कोटी, २०२१-२२ मध्ये ८० कोटी, २०२२-२३ मध्ये १२७ कोटी, २०२३-२४ मध्ये १४५ कोटी आणि २०२४-२५ मध्ये २२० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. गेल्या पाच वर्षात २०२४-२५ साली सर्वाधिक नुकसान भरपाईची रक्कम वन विभागाने अदा केली आहे. यामुळे राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे नुकसान भरपाईच्या वाढलेल्या आकड्यावरुन स्पष्ट होत आहे. राज्यात सध्या वाघ आणि बिबट्यांमुळे होणाऱ्या मानवी मृत्यूत वाढ झाली आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात १ जानेवारी ते ११ मे या कालावधीत वाघाच्या हल्ल्यात १३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर काळवीट, निलगाय, माकड, हत्ती, रानडुक्कर या प्राण्यांमुळे शेतपिकांचे नुकसान होते.