ठाणे : जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत फडणवीस यांनी ठाण्यातील पूरपरिस्थितीची माहिती घेतली. पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मदतकार्याचे समन्वय करण्याच्या सूचना दिल्या.
अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे (एनडीआरएफ) अजून सहा तुकड्या पाठविण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुरातील बाधितांना वाचविण्यासाठी लष्कर, नौदल आणि अन्य यंत्रणांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.