मुंबई : अग्निशमन दलात मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने महापालिकेच्या ६८६ शाळांचे ‘फायर ऑडिट’च झालेले नाही. त्यामुळेच मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या १,०९६ शाळांपैकी ६८६ शाळांचे ‘फायर ऑडिट’ अद्याप झालेले नाही. त्यामुळे ‘फायर ऑडिट’चे काम त्रयस्थ संस्थांना देण्याबाबतचे धोरण अवलंबिण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार असून शाळांच्या ‘फायर ऑडिट’चा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अग्निशमन अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एबीसी’ (ड्राय केमिकल पावडर) प्रकारची ३ हजार १०७ यंत्रे, सीओ२ प्रकारची ४८० यंत्रे अशी एकूण ३ हजार, ५८७ यंत्रे बसविली आहेत. ही यंत्रे २०१४-१५ मध्ये बसविली आहेत. २०१५-१६ मध्ये नवीन दोन हजार अग्निशमन यंत्रे बसविली आहेत. २०१७-१८ मध्ये आणखीन ७२ नवीन यंत्रे खरेदी केली आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात ४११ अनुदानित आणि ६८५ विना अनुदानित शाळा आहेत. त्यांचेही ‘फायर ऑडिट’ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, शाळांची संख्या मोठी आणि अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाची कमतरता यामुळे ऑडिटच्या कामाला गती नसल्याचे उघड झाले आहे.
नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी शाळांचे फायर ऑडिट करण्यासाठी अग्निशमन दलात मनुष्यबळाचा तुटवडा असल्याची गंभीर बाब समोर आणली आहे. फायर ऑडिट करण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित तपासणी आणि मॉकड्रिल संबंधित त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून केल्यास तसेच त्या संस्थेने त्या आस्थापना सुरक्षेसंबंधात सक्षम असल्याचे प्रमाणित केल्यानंतर त्यांना योग्य ते प्रमाणपत्र पालिका देईल. त्यामुळे त्या त्रयस्थ संस्थेमुळे मनुष्यबळाचा तुटवडा दूर होईल, असा विश्वास डॉ. खान यांनी व्यक्त केला आहे.