मुंबई : कॉल चालू असताना कॉल ड्रॉप होणे ही आता सामान्य बाब झाली आहे. अशातच एखादा महत्वाचा कॉल असेल तर ग्राहकांना याचा मोठा फटका बसतो. यामुळे ट्राय व दूरसंचार मंत्रालयाने यावर अनेक निर्बंध घालून देखील दूरसंचार कंपन्यांना कॉल ड्रॉपवर लगाम लावू शकल्या नाहीत. यामुळे दूरसंचार कंपन्यांना तब्बल ५८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जानेवारी २०१८ ते जून २०१८ या कालावधीतील हा दंड ठोठावल्याची माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत दिली.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दूरसंचार कंपन्यांना कॉल ड्रॉप प्रकरणी दंड ठोठावल्याची माहिती दिली. दंड ठोठावण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने बीएसएनएल आणि आयडिया कंपनीचा समावेश असून इतर कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे. सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयडीया कंपनीला १२ लाख रुपये व बीएसएनएलला चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दूरसंचार कंपन्या देत असलेल्या सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सिन्हा यांनी दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/