भाजपाला प्रचंड जनसमर्थन मिळाल्याने विरोधकांच्यापायाखालची वाळू सरकली : अपप्रचाराची शक्यता

    31-Jul-2018
Total Views | 15

 
भाजपाला प्रचंड जनसमर्थन मिळाल्याने विरोधकांच्या
पायाखालची वाळू सरकली : अपप्रचाराची शक्यता
 
जळगाव, ३० जुलै 
 
जळगाव शहराचा विकास होण्यासाठी महापालिकेत भाजपाची सत्ता यावी असा निर्धार जळगावकरांनी केला आहे. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या शिवसेना नेत्यांची काळजी अधिक वाढली आहे. यातून मतदारांची दिशाभूल करण्याचे घाणेरडे प्रकार त्यांनी सुरू केले आहेत. पण जळगावचा सुज्ञ मतदार त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही आणि महापालिकेची एकहाती सत्ता भाजपालाच देईल, असा ठाम विश्‍वास आ. सुरेश भोळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
 
सध्या जळगाव महापालिकेची निवडणूक अत्यंत रंगात आली असून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातच समोरासमोर लढत आहे. भाजपाने प्रारंभापासूनच ‘५० प्लस’ चा नारा दिला होता. त्या दृष्टिने कार्यकर्ते कामाला लागले होते. युतीबद्दल विलंब होत असतांना बहुतांश कार्यकर्त्यांनी युती नको तर भाजपानेे स्वबळावर निवडणूक लढवावी असे मत व्यक्त केले होते. युती न झाल्याने भाजपाने आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली. दरम्यान, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर भाजपात सामील झाल्याने भाजपाची ताकद अधिक वाढली. स्वाभाविकपणे या सर्व गोष्टींचा परिणाम भाजपाच्या जागा वाढण्यात होणार असल्याने शिवसेना नेत्यांची काळजी अधिक वाढली. त्यातून मतदारांची दिशाभूल करण्याचे असले घाणेरडे प्रकार सुरू झाले आहेत, असे आ. सुरेश भोळे यांनी सांगितले.
भाजपा उमेदवारांची सध्या प्रचाराची स्थिती काय आहेे? असे विचारता, आ.सुरेश भोळे म्हणाले की, सर्व स्थिती अत्यंत उत्तम आहे. सर्वजण जोमाने कामाला लागले आहेत. यावेळी महानगरपालिकेत भाजपालाच सत्तास्थानी बसवायचे आहे या एकाच ध्येयाने सर्वजण प्रचारकार्यात गुंतले आहेत. अगदी आ.नाथाभाऊच नव्हे तर खा.रक्षाताई खडसेसुध्दा उमेदवारांचा जोमाने प्रचार करीत आहेत. असे असतांना असे विपरीत मेसेज व्हायरल करण्यामागे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याचेच दिसत आहे. नाथाभाऊंच्या नावाने असे नथीतून तीर मारण्याचा उपद्व्याप करणारे कोण आहेत? हे जळगावकर जाणून आहेत. भाजपाच्या वाढत्या प्रभावाने भयभीत झालेल्या विरोधकांनी आता असे अकारण बदनामीचे प्रकार सुरू केले आहेत असे मला वाटते. यात अकारण जातीच्या नावावर, समाजाच्या नावावर, लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकार होतील किंवा आ.नाथाभाऊंच्या नावाचा वापर करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचाच विरोधकांचा हा प्रयत्न आहे, हे स्पष्ट आहे. मी सुध्दा लेवा समाजातील असून विधानसभा निवडणुकीत मला लेवा समाजाप्रमाणेच अन्य बहुजन समाजातील मतदारांनीसुध्दा भरघोस मतदान करून निवडून आणले आहे. हेही सुज्ञ जळगावकरांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे भाजपात लेवा समाजाच्या नावावर मतविभागणी होईल असे समजण्याचे काहीही कारण नाही, असे सांगून अशा प्रकारांना कुणीही बळी पडणार नाही आणि भाजपाला मिळणार्‍या मतांचे विभाजनही होणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी पुनश्‍च व्यक्त केला. तसेच समाजाची दिशाभूल करण्याचे प्रकार मुद्दाम घडवले जात असतील, तर जनतेने ते हाणून पाडावेत, असे आवाहनही आ. भोळे यांनी केले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121