जळगाव, ९ जून :
येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून आकरावी आणि बारावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शनिवार, ९ रोजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जळगाव जनता सह. बँकेच्या सेवा कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठआप्पा गायकवाड तर प्रमुख अतिथी गोसेवक नरेश खंडेलवाल उपस्थित होते.
सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून पाठ्यपुस्तक सहयोग योजना कार्यान्वित आहे. ज्यात आत्तापर्यंत एकूण १४४० विद्यार्थ्यांनी पुस्तकांचा लाभ घेतला आहे. दरवर्षी इ. ९ वी ते १२ वीच्या गरजू विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांमध्ये पाठ्यपुस्तक देण्यात येते. यावर्षीच्या दुसर्या टप्प्यात अकरावी आणि बारावीच्या ७० विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यात आले. नरेश खंडेलवाल यांनी आपल्या प्रमुख भाषणात पुस्तकांचे व्यवस्थित जपवणूक करून पुढील वर्षी अन्य गरजूंना मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांकडून घेतले.
कार्यक्रमात कृणाल महाजन यांनी प्रास्ताविक केले, ज्योती रायपुरे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन, तर आभार प्रदर्शन स्नेहा तायडे यांनी केले. यावेळी मानव संसाधन शाखेचे व्यवस्थापक हेमंत भिडे, निशा शर्मा आदी उपस्थित होते.