मुंबई : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा त्वरित मार्गी लागावा यासाठी विनोद पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी करणार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मराठा समाजाला सामाजिक आर्थिक व मागास प्रवर्ग (एसईबीसी) म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्टीकरण देताना राज्यात आरक्षणाची स्थिती काय असेल याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आरक्षण कसे असेल त्याबाबत मंत्रीमंडळ उपसमिती निश्चित करणार आहे. मराठा आरक्षण न्यायालयात कसे टीकेल त्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सोमवारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. न्या.धर्माधिकारी आणि न्या. कोतवाली यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करून घेत २१ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल, असे म्हटले आहे. या प्रकरणी बुधवारच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/