खान्देशासह राज्यातून 15 हजार बांधव सहभागी होणार
जळगाव, 13 नोव्हेंबर
जनजाती समाज, वनवासी बांधवांच्या जीवनमरणाचे प्रश्न, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त अस्मितेचा हुंकार जागविण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी गुरुवार दि.15 नोव्हेंबर रोजी मुंबईत राज्यस्तरीय धडक मोर्चा ‘वणवा’ चे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 ओव्हल मैदानावरुन धडक मोर्चाला प्रारंभ होईल. सुमारे 5 किलोमीटर अंतरावर मंत्रालयावर तो जाईल. तेथे मान्यवर मंत्री महोदय व अन्य वरिष्ठांना मागण्यांचे निवेदन दिले जाईल.
त्यात खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 3 हजार आणि राज्यभरातून एकूण 15 हजार जनजाती , वनवासींचे प्रतिनिधी बांधव सहभागी होतील.
यासंबंधी मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत मोर्चाचे संयोजक आणि वनवासी कल्याण आश्रमाचे देवगिरी प्रांत अध्यक्ष तसेच अनेक पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार (बारीपाडा, ता.साक्री) आणि संघटनमंत्री गणेश गावीत (जळग़ाव) यांनी माहिती दिली.
उद्योगपती रजनीकांत कोठारी, प्रांत सहसचिव रवींद्र नाईक, रा.स्व.संघाचे देवगिरी प्रांत प्रचार प्रमुख स्वानंद झारे आदी उपस्थित होते.
...या आहेत मागण्या
बोगस आदिवासींची चौकशी, त्यांनी लाटलेल्या नोकर्या व लाभ परत घेणे, विस्थापनाआधी पुनर्वसन, वनहक्क कायद्यानुसार सामुहिक वनाधिकार बहाल करण्यास गती मिळावी, पेसा कायद्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, विविध परंपरांचे जतन, जनजातीतील क्रांतीकारकांची स्मारके उभारणे, त्यांचे विस्थापन, स्थलांतर रोखणे, आदिवासींच्या योजनांची कार्यवाही रोखणार्यांवर कठोर दंडात्मक कारवाई व्हावी, जनजातीच्या विद्यार्थ्यांचे भत्ते, शिष्यवृत्ती, शुल्क इ.चे प्रश्न सुटावेत इ. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे.
अपेक्षित विकासाचे चक्र गतिमान होण्यासाठी...
शासनाने जनजाती समाजाच्या विकासासाठी प्रशासकीय रचना व अर्थसंकल्पात ठळक तरतूद केली असली तरी अपेक्षित विकास झालेला नाही, हे चक्र गतिमान होण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करुन त्यांची सोडवणूक तातडीने व पारदर्शी रितीने व्हावी, यासाठी हे आंदोलन आहे.