बँकिंग एक सामाजिक सेवा आहे. पण ती निःशुल्क नाही. या सेवा मिळवण्यासाठी जनसामान्यांना काही शुल्क मोजावे लागते. म्हणजेच हा एक नफा कमावणारा व्यवसाय आहे. जेथे नफा आहे, तेथे तोट्याचीही तयारी मनात ठेवावीच लागते. नफा कमवायचा तर काही धोका पत्करणे भाग असते. किंबहुना ‘नफा म्हणजे – धोका पत्करण्याचे पारितोषिकच’ असते. कोणताही व्यावसायिक धोके कमी कसे करता येतील यासाठी निरंतर प्रयत्न करीतच असतो. बँकिंगही त्यास अपवाद नाही.
बँकिंग व्यवसायाची काही खास वैशिष्ट्ये आहेत.
इतके सारे करूनही...
आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही कर्ज वसुली रेंगाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्ज वसुली वेळेवर न झाल्यास ठेवीदारांचे हित धोक्यात येते. हा व्यवसाय आहे; यात धोके संभवतातच. देशाची सारीच प्रगती उद्योग-व्यवसायावर अवलंबून! त्यांना कर्जे न मिळाल्यास विकास होणारच नाही. हे लक्षात घेऊन शासन बँकिंगवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. आपल्या देशात हे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सोपवले आहे. ती बँकांची बँक होय. या मध्यवर्ती बँकेस बँकिंग नियमन कायदा १९४८ द्वारा विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
वेळोवेळी परिपत्रके जारी करून, हा व्यवसाय कसा करावा याबाबत मार्गदर्शन रिझर्व्ह बँक करते. दिलेल्या सूचनांचे पालन व्यवस्थित होत आहे ना यावरही नजर ठेवते. ह्या करिता बँकांना नाना तऱ्हेची मासिक / त्रैमासिक / वार्षिक विवरणपत्रे रिझर्व्ह बँकेस सादर करावी लागतात. खेरीज दरवर्षी रिझर्व्ह बँक, प्रत्येक बँक व तिच्या विशिष्ट शाखा यांना भेट देऊन तपासणीही करते. त्या शिवाय सुयोग्य अशा मान्यताप्राप्त सनदी लेखा परीक्षकाकडून बँकांचे ताळेबंद तपासणे बंधनकारक आहे.
या व्यवसायातील धोके टाळण्यासाठी बँकिंग नियमन कायद्यात बऱ्याच तरतुदी केल्या आहेत; पहिली महत्त्वाची तरतूद म्हणजे कायद्यात नमूद केलेल्या बँकिंग व्यवसायाखेरीज अन्य व्यवसाय बँकांना करता येत नाहीत. स्वातंत्र्यापूर्वी अनेक बँका, बँकिंग खेरीज अन्य व्यापार उदीम करीत. तिकडे आलेला तोटा, बँकिंग व्यवसायास हानिकारक ठरू लागला; कित्येक बँका या कारणाने बुडाल्या. म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे.
जमा झालेल्या सर्वच्या सर्व ठेवी कर्जापोटी देता येणार नाहीत ही दुसरी तरतूद. एकूण सर्व देण्यांपैकी (सध्या) किमान ४% रक्कम बँकांना स्वतःजवळ अथवा रिझर्व्ह बँकेकडे रोकड स्वरुपात ठेवावी लागते. यामुळे ठेवीदारांच्या मागण्या त्वरित पुऱ्या करणे शक्य होते. त्याच बरोबर या एकूण देण्यापैकी (सध्या) किमान २१% रक्कम शासकीय रोख्यात (अथवा रिझर्व्ह बँकेने मान्य केलेल्या प्रकारात) गुंतवावे लागतात. या तरतुदीमुळे बिकट प्रसंगी या गुंतवणुकी मोडून ठेवीदारांचे समाधान करण्याचा मार्ग उपलब्ध होतो. कर्जवसुलीची वाट न पाहता ठेवीदारांच्या मागण्या पुऱ्या करता येतात. आणि बँकेचा बचाव होतो.
बँकांच्या ताळेबंदाकडे नजर टाकल्यास असे आढळते, की बँकांचे स्वतःचे भांडवल एकूण उलाढालीच्या जेमतेम ५% - ६% च असते. बाकी सर्व निधी उधार उसनावारीचा! हा स्वनिधी वाढवा म्हणून एकूण नफ्याच्या किमान २५% नफा दरवर्षी राखीव निधीत जमा करण्याचे बंधन बँकांवर आहे. या खेरीज नियमानुसार अन्य राखीव निधी देखील उभारल्या नंतरच लाभांश रूपाने नफा वाटप करता येतो.
त्या शिवाय एकूण मालमत्तेच्या तुलनेत जोखीम भारित किमान ९% एवढे भांडवल (स्वनिधी) असलेच पाहिजे अशी अट टाकण्यात आली आहे. बँक अधिक सक्षम करण्यासाठी त्यातही भांडवलाच्या अंतर्गत रचनेत विशेष सुधारणा करण्यास सांगितले आहे. सध्या देशाच्या एकूण बँकिंग व्यवसायातील सुमारे ८०% व्यवसाय हा सार्वजनिक क्षेत्रातील (शासकीय मालकीच्या) बँकांकडे आहे. केंद्र शासनाने या बँका अधिक सक्षम करण्यासाठी आगामी पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर भांडवल पुरवठा कण्याचे घोषित केले आहे.
नव्या बँकांसाठी किमान रु. ५०० कोटी भांडवल असायला हवे ही देखील महत्त्वाची तरतूद मानायला हवी. इतके करूनही जर बँक दिवाळखोरीत निघालीच तर जनसामान्यांना फटका बसू नये म्हणून रु. एक लाखापर्यंतच्या ठेवींना ठेव विमा महामंडळामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. या विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून न घेता बँकांना स्वतःच्या नफ्यातोट्यातून भरावा लागतो. (अर्थात बँक त्या प्रमाणात कर्जाचे व्याज दर वाढवतात व हा हप्ता कर्जदारांकडून वसूल करतात.) (क्रमशः)
- श्रीकांत धुंडिराज जोशी