मणिपूर पुन्हा पेटलं! आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न, जमावबंदी लागू; पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

    09-Jun-2025   
Total Views | 13

Manipur Tense Over the Arrest of Arambai Tenggol Leader; Curfew Imposed
 
इंफाळ : (Manipur Tense Over the Arrest of Arambai Tenggol Leader) मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मणिपूर सातत्याने धुमसत आहे. येथील तणाव निवळण्याची चिन्हं दिसत नाही. राज्यातून हिंसाचाराच्या बातम्या वेळोवेळी येत राहतात. आता मैतेई समुदायाच्या एका प्रमुख नेत्याच्या अटकेनंतर मणिपूरमध्ये हिंसाचाराची लाट उसळली आहे. यामुळे इंफाळसह पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. तर विष्णुपुर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल आणि काकचिंग या जिल्ह्यांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
 
शनिवारी रात्री मैतेई समुदायाच्या अराम्बाई तेंगोल या संघटनेचे नेते कानन सिंग यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर इंफाळसह अनेक भागांमध्ये तीव्र निदर्शन सुरू झाली. काही ठिकाणी जमाव हिंसक झाला.संतप्त जमावाने रस्त्यांवर टायर आणि फर्निचर पेटवून दिले. काही आंदोलकांनी स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली, तर काहींनी प्रत्यक्षात असे प्रयत्नही केले. काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणा आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर प्रशासनाने या जिल्ह्यात अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण केले आहे.
 
 
 
इंटरनेट सेवा बंद
 
गृह विभागाचे सचिव एन. अशोक म्हणाले की, "कानन सिंग यांच्या अटकेच्या आडून काही जण समाज माध्यमांचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रक्षोभक संदेश, चित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रक्रियेला गालबोट लागण्याची शक्यता आहे. या घटनांमुळे कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीन परिस्थितीत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे असामाजिक तत्त्वे त्यांचा अजेंडा राबवू शकणार नाहीत. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल."
 
दोन वर्षांपासून मणिपूर अशांत
 
मणिपूर ३ मे २०२३ पासून अशांततेच्या सावटाखाली आहे. मैतई बहुल आणि कुकी बहुल परिसरात हिंसा झाली. तेव्हापासून हे दोन्ही समाज एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातून त्यांच्यात हिंसा झाली आहे. कुकी समाजाला सध्या राज्यात अनसूचीत जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. मैतेई समाज सुद्धा अनुसूचीत जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. तर कुकी समाजाने मैतईंच्या या मागणीला कडाडून विरोध केला आहे. तेव्हापासून दोन्ही समाजात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. ९ मे रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121