‘ऑपरेशन सिंदूर’चा दुसरा दणका लाहोरला, हवाईसुरक्षा यंत्रणा भारताने केली उध्वस्त

- कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची माहिती - पाकिस्तानतर्फे भारतीय नागरिक लक्ष्य, १६ निरपराधांचे बळी

    08-May-2025
Total Views |
 ‘ऑपरेशन सिंदूर’चा दुसरा दणका लाहोरला, हवाईसुरक्षा यंत्रणा भारताने केली उध्वस्त

नवी दिल्ली, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा दुसरा दणका गुरुवारी सकाळी लाहोरला बसला असून पाकिस्तानच्या या प्रमुख शहराची हवाईसुरक्षा यंत्रणा भारताने उध्वस्त केली आहे. त्यामुळे आता लाहोरसह रावळपिंडी आणि इस्लामाबादही भारताच्या लक्ष्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत गुरुवारी सकाळी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाईदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी दिली. यावेळी सैन्याधिकारी म्हणाले, आज, गुरुवारी सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताचे प्रत्युत्तर त्याच स्तरावर आणि त्याच तीव्रतेने होते. यासंदर्भात विश्‍वसनीय सूत्राकडून आलेल्या माहितीप्रमाणे, लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली आहे, असे कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंह यांनी सांगितले.

पाकने केलेल्या कृत्यास प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भातील ७ मे २०२५ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक असल्याचे म्हटले होते. यावेळी हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. तसेच, यापुढे भारतातील कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला केला गेला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले. या इशा-यानंतरही ७ आणि ८ मे 2025 च्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताकडून हे हल्ले ‘इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड’ व ‘एअर डिफेन्स सिस्टम’ने निष्फळ ठरवले. या हल्ल्यांचे पुरावे म्हणून विविध ठिकाणी आढळून आलेले अवशेष सध्या जमा करण्यात येत आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.


एलओसीवर पाकचा गोळीबार, निष्पापांचा बळी

· पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरून (एलओसी) विनाकारण गोळीबार वाढवला आहे. त्यांनी कमी क्षमता असलेली तोफ आणि त्याचबरोबर उच्च क्षमता असलेल्या तोफांचा वापर करून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये गोळीबार केला.

· या पाकिस्तानी गोळीबारामुळे तीन महिला आणि पाच लहान मुलांसह सोळा निरपराध नागरिकांचे प्राण गेले. सामान्य निष्‍पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे या परिस्थितीत भारताला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले गेले आहे. भारताने दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे पाकिस्तानकडून होणारा लहान तोफांचा आणि जास्‍त क्षमतेच्या तोफांचा गोळीबार थांबवण्यात आला.

· भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा आपली गैर-उत्तेजक भूमिकेची बांधिलकी अधोरेखित केली आहे. पाकिस्तानी लष्करानेही भारताने स्वीकारलेल्या भूमिकेचा सन्मान केला, तरच भारताला ही भूमिका कायम ठेवणे शक्य होणार आहे.


भारताच्या ‘सुदर्शन चक्रा’ने पाक घायाळ

· भारताच्या हवाई हल्ल्यानंतर, जेव्हा पाकिस्तानने भारतीय शहरांना लक्ष्य केले, तेव्हा भारताने त्यांनाही धडा शिकवला. भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली एचक्यू-९ नष्ट केल्याचे वृत्त आहे.

· हे काम भारताच्या सर्वात मजबूत हवाई संरक्षण प्रणाली एस-४०० ने केले आहे. ही अशी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी हल्ला होताच सक्रिय होते आणि शत्रूचे विमान किंवा क्षेपणास्त्र त्वरित नष्ट करते.

· भारतीय सैन्याने या संरक्षण प्रणालीला सुदर्शन चक्र असे नाव दिले आहे.

· एस-४०० ही जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणाली मानली जाते. रशियाच्या अल्माझ-अँटे यांनी ही क्षेपणास्त्र प्रणाली तयार केली आहे. एस-४०० ही एक लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी मोबाइल क्षेपणास्त्र प्रणाली आहे.

· त्यात स्टेल्थ फायटर जेट्स, बॉम्बर्स, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अगदी मानवरहित हवाई वाहने (युएव्ही) यासह अनेक हवाई लक्ष्ये पाडण्याची क्षमता आहे.

· त्यात चार वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत, जी ४०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकतात.

· एस-४०० मध्ये दोन स्वतंत्र रडार सिस्टीम आहेत, ज्या ६०० किलोमीटर अंतरापर्यंत हवाई लक्ष्य शोधू शकतात आणि एकाच वेळी ८० हवाई लक्ष्यांना लक्ष्य करू शकतात.

· एकदा सिस्टम सक्रिय झाली की, सिग्नल मिळाल्यानंतर ३ मिनिटांत ती फायरिंगसाठी तयार होते. म्हणजे शत्रूचा हल्ला लगेच हाणून पाडला जातो.