ऑपरेशन सिंदूर – २५ मिनिटात ९ इस्लामी दहशतवादी तळ उध्वस्त

- कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितला भारतीय सैन्यलांचा पराक्रम

    07-May-2025
Total Views |
ऑपरेशन सिंदूर – २५ मिनिटात ९ इस्लामी दहशतवादी तळ उध्वस्त

नवी दिल्ली,  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त जम्मू काश्मीर (पीओजेके) मध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ची भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी सविस्तर माहिती दिली.


भारताने केलेल्या लक्ष्यित हल्ल्यानंतर काही तासांतच राष्ट्रीय राजधानीत पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी या कारवाईचे उद्दिष्ट स्पष्ट केले.


पाकिस्तानने गेल्या तीन दशकांपासून एक जटिल दहशतवादी पायाभूत सुविधा उभारली आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमध्ये २१ भरती, शिकवण आणि लाँच पॅड केंद्रे आहेत. ऑपरेशन सिंदूरचे लक्ष्य विश्वासार्ह गुप्तचर माहिती आणि ठिकाणांवर आधारित होते जे नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान आणि नागरिकांचे जीवितहानी टाळण्यासाठी निवडले गेले होते, असे सिंह यांनी ऑपरेशनची अचूकता अधोरेखित केली. यामध्ये पीओजेके आणि पाकिस्तानमधील एकूण ९ तळांचा समावेश होता, असेही विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले.


पत्रकार परिषदेत, कर्नल सोफिया कुरेशी यांनी मुरीदके येथील दहशतवादी छावण्या नष्ट करण्याचे व्हिडिओ सादर केले आणि जिथे २००८ च्या मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार डेव्हिड हेडली आणि अजमल कसाब यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मुरीदके व्यतिरिक्त, सियालकोटमधील सरजल छावणी, मरकज अहले हदीस, बर्नाला आणि मरकज अब्बास, कोटली आणि मेहमूना जोया छावणी, सियालकोट येथे भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले, असे कर्नल कुरेशी यांनी सांगितले.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तान आणि पीओजेके मध्ये असलेल्या अनेक दहशतवादी छावण्यांबद्दल सविस्तर माहिती दिली, जे भारतीय भूमीवर हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जात होते. त्या म्हणाल्या, सियालकोट येथील सरजल कॅम्प पाकिस्तानच्या आत सुमारे ६ किमी अंतरावर स्थित आहे. मार्च २०२५ मध्ये चार जम्मू आणि काश्मीर पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना तेथेच प्रशिक्षण देण्यात आले होते. पाकमध्ये १२ ते १८ किमी अंतरावर असलेल्या सियालकोटमधील मेहमूना जोया कॅम्प हा हिजबुल मुजाहिदीनच्या सर्वात मोठ्या तळांपैकी एक होता. येथून कठुआ आणि जम्मू प्रदेशात दहशतवादी कारवाया करण्यात येत असत. पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ल्याची योजनाही येथेच आखण्यात आल्याचे कर्नल कुरेशी यांनी यावेळी सांगितले.


पाकच्या आत १८ ते २५ किमी अंतरावर असलेल्या मुरिदके येथील मरकझ तैयबा येथील तळावरच २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसह कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले. त्यासही नष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पाकच्या आत १०० किमी अंतरावर असलेल्या बहावरपूर येथील मरकझ सुभानअल्लाह तळ जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. कर्नल कुरेशी यांनी अलिकडच्या लष्करी कारवाईत भारतीय सशस्त्र दलांनी हा कॅम्प उद्ध्वस्त केल्याची पुष्टी केली.


त्याचप्रमाणे पीओजेकेमधील मुझफ्फराबाद येथील शवाई नल्लाह या लष्कर-ए-तोयबाच्या कॅम्पने सोनमर्ग (२० ऑक्टोबर २०२४), गुलमर्ग (२४ ऑक्टोबर २०२४) आणि पहलगाम (२२ एप्रिल २०२५) येथे झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. त्याचप्रमाणे तेथीलच सय्यदना बिलाल कॅम्प जैश-ए-मोहम्मदचा स्टेजिंग एरिया म्हणून ओळखला जात असे. पीओजेकेमध्ये नियंत्रण रेषेपासून (एलओसी) ३० किमी अंतरावर स्थित कोटली येथील गुलपूर कॅम्प हा लष्कर-ए-तैयबाचा होता. येथेच २० एप्रिल २०२३ रोजी पूंछ येथे झालेला हल्ला आणि ९ जून २०२४ रोजी झालेल्या यात्रेकरू बस हल्ल्याचा कट आखण्यात आला होता. त्याचप्रमाणे पीओजेकेमधील भिंबर येथील बर्नाला कॅम्प शस्त्रे, आयईडी आणि जंगलातील बचाव प्रशिक्षण केंद्र म्हणून चालवण्यात येत होता. त्याचप्रमाणे कोटली येथील एओसीपासून १३ किमी अंतरावर असलेला १५ आत्मघातकी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा तळही नष्ट करण्यात आल्याचे कर्नल कुरेशी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


म्हणूनच निवडली ही ९ ठिकाणे


• बहावलपूर : बहावलपूर हा पाकिस्तानातील दक्षिण पंजाबमधील एक भाग आहे. बहावलपूर हे भारतीय हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते. प्रत्यक्षात, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय बहावलपूरमध्येच आहे. जैश प्रमुख मौलाना मसूद अजहर, मुफ्ती अब्दुल रऊफ असगर आणि मौलाना अम्मर यांचे घरही येथे आहे.

• मुरीदके : लाहोरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेले मुरीदके हे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि तिची शाखा जमात-उद-दावाचे केंद्र असल्याचे मानले जाते. २००८ मध्ये भारतातील मुंबई हल्ल्यातही लष्करचा सहभाग होता. २६/११ च्या हल्लेखोरांनाही मुरीदके येथे प्रशिक्षण देण्यात आले होते.


• कोटली : कोटली हा पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग आहे. येथे आत्मघाती बॉम्बर आणि अतिरेक्यांचे प्रशिक्षण केंद्र आहे.

• गुलपूर : जम्मू आणि काश्मीरमध्ये गुलपूर हे दहशतवाद्यांचे लाँचपॅड मानले जाते. विशेषतः राजौरी आणि पूंछ भागात दहशतवादी घुसखोरी गुलपूरमधूनच होते.

• सियालकोटमधील महमूना कॅम्प : सियालकोटमधील महमूना कॅम्पलाही लक्ष्य करण्यात आले आहे. महमूना कॅम्प हे हिजबुल मुजाहिदीनचे लपण्याचे ठिकाण होते.

• शवाई : पाकव्याप्त काश्मीरमधील तंगधार सेक्टरमधील सवाई परिसरात लष्कर-ए-तैयबाचा एक तळ आहे. २०२४ मध्ये गंदरबल, गुलमर्ग आणि आता पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे नियोजनही सवाईमध्येच करण्यात आले होते.

• सरजल, बर्नाला आणि भिंबर : आंतरराष्ट्रीय सीमेवरील हे भाग काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरीसाठी लाँचपॅड मानले जातात.