गोव्यात लैराई जत्रेदरम्यान मोठी चेंगराचेंगरी

सात जणांचा मृत्यू; ५० हून अधिक जण जखमी

    03-May-2025
Total Views |

Goa Stamped News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Goa Stamped News) 
गोव्यातील शिरगाव येथे प्रसिद्ध धार्मिक लैराई जत्रेदरम्यान शनिवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी २० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. श्री लैराई जत्रा हा उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील शिरगाव गावात आयोजित केला जाणारा हिंदू धार्मिक उत्सव आहे. दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात जत्रा भरते. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक येथे येतात. ही जत्रा २ मे रोजी संध्याकाळपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत चालली. याच दरम्यान हा अपघात झाला.

हे वाचलंत का? : सुहास शेट्टी हत्या प्रकरणी पोलिसांच्या तपासात मोठी बाब उघडकीस

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने भाविक जत्रेत सहभागी होण्यासाठी मंदिराकडे जात होते. दरम्यान, दुकानासमोरील विजेच्या तारेचा धक्का लागून काही लोक खाली पडले. त्यामुळे उडालेल्या गोंधळाने चेंगराचेंगरी झाली. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांमधून ३० ते ४० हजार लोक यात्रेत सामील होण्यासाठी आले होते. शुक्रवारी संध्याकाळी गर्दी मंदिराकडे जात असताना काही लोक उतारावर पडले. त्यानंतर मागून येणारे लोकही एकमेकांवर पडले. गर्दी व्यवस्थापनाच्या पुरेशा व्यवस्थेअभावी ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सदर घटनेच्या चौकशीचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

 
सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील
शिरगावमध्ये लैराई जत्रेदरम्यान घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून पीडितांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील याची खात्री करणे हे माझे वैयक्तिक ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली आणि या कठीण काळात पूर्ण सहकार्य केले.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा