- राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
26-May-2025
Total Views |
मुंबई, रविवारसह सोमवारी बरसणाऱ्या पावसाने राज्यात अनेक ठिकणी नुकसाने केले. मंगळवार, दि. २७ मे रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.
सोमवार, दि. २६ मे रोजी मुंबईसह महानगर प्रदेश, पुणे, सातारा, सोलापूर आणि रायगडमध्ये अतिवृष्टीजन्य पाऊस झाला. दौंडमध्ये ११७ मि.मी., बारामतीत १०४ मि.मी., इंदापुरात ६३ मि.मी. इतका पाऊस नोंदवण्यात आला. बारामतीत २५ घरांशी पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. ७० ते ८० कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. फलटणमध्ये १६३ मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची टीम तेथे तैनात करण्यात आली. ३० नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली.
सोलापूरमध्ये ६७ मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात ६ नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात ३ जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे. रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.
मुंबईत २४ तासांत १३५ मि.मी पाऊस
- मुंबईत २४ तासात १३५.४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. एकूण ६ ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण १८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर ५ ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. मुंबईत ५ ठिकाणी एनडीआरएफ टीम मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
- दरम्यान, मुंबईत पुढील २४ तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिव तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ - एसडीआरएफ, अग्निशमन, महसूल प्रशासन तसेच गृह विभाग आदींना नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना आणि मदत व बचावासाठीची सज्जता ठेवण्याच्या अनुषंगानेही त्यांनी विविध सूचना केल्या. जलसंपदा विभागाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा
पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत.
मच्छिमारांनो, समुद्रात जाऊ नका!
मंगळवारी पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांत वाऱ्याच्या वेगासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दि. २८ आणि २९ मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. दरम्यान, या काळात घाट विभागांत येलो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडासह पाऊस पडणार असल्याने या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच किनारपट्टी परिसरात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाच्या वातावरणात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
३४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
मुसळधार पावसामुळे राज्यातील जवळपास ३४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात केळी, आंबा, भात, चिक्कू या पिकांचे ७९६ हेक्टर नुकसान झाले. धुळे जिल्ह्यात बाजरी, मका, कांदा, पपई, केळी यांचे ६४५ हेक्टर, नाशिकमध्ये भाजीपाला, कांदा, बाजरी, मका, केळी यांचे ३ हजार २३० हेक्टर नुकसान झाले. अहिल्यानगर येथे कांदा, बाजरी, पपई, आंबे, चिकू आणि इतर पिकांचे मिळून १ हजार १५६ हेक्टर इतके नुकसान नोंदवण्यात आले. पुणे जिल्ह्यात देखील आंबा, बाजरी, मका, कांदा, भाजीपाला असे ६७६ हेक्टर नुकसान झाले. बुलढाणा जिल्ह्यात जवळपास ४ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी संचालक रफिक नाईकवडे यांनी दिली.