मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आता युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात साई सुदर्शन, आणि करुण नायर यांचा समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यरला मात्र या मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप यांचा समावेश असून, मोहम्मद शमी अद्याप फिटनेस चाचणीला सामोरा जात आहे.
फिरकी गोलंदाजीत रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे मुख्य पर्याय असतील. यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांच्यापैकी एकाला अंतिम संघात स्थान मिळणार आहे.
ही मालिका २०२५-२७ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. पहिला सामना २० जूनला हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे.