मुंबई :“संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माझे वडील रामचंद्र गवई यांचे सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी मी कार्यरत राहीन,” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी केले. तसेच, “आज मी जो काही आहे, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचार आणि संघर्षामुळे आहे. या पदापर्यंत पोहोचताना अनेकांनी मला मदत केली. थेट किंवा अप्रत्यक्षरित्या त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो,” असे सांगताना सरन्यायाधीश न्या. गवई यांचा कंठ दाटून आला.
भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या सन्मानार्थ ‘महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन’ आणि ‘बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत ‘बार कॉन्क्लेव्ह’चे रविवार दि. 18 मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक प्रसंगी देशभरातून मान्यवर न्यायमूर्ती, वरिष्ठ वकील आणि कायदाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून न्या. भूषण गवई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक अराधे यांनी भूषवले, तर कार्यक्रमास विशेष सन्माननीय अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत, अभय ओक, दीपंकर दत्ता आणि प्रसन्न वराळे, तसेच केरळ उच्च न्यायालयाचे न्या. नितीन जामदार, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. ए. एस. चांदुरकर आणि न्या. रेवती मोहिते-ढेरेदेखील उपस्थित होते. दरम्यान, आई कमला गवई आणि पत्नी डॉ. तेजस्विनी गवई यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
कायदाक्षेत्रातील मान्यवरांमध्ये ‘बार काऊन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष तथा राज्यसभा खा. मनन कुमार मिश्रा, भारत सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग, गोवा सरकारचे अधिवक्ता देविदास पंगम यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण ‘महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन’चे अध्यक्ष विठ्ठल कोंडे-देशमुख यांनी केले.
सरन्यायाधीश भूषण गवईंचा प्रवास प्रेरणादायी
भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा प्रवास भारतातील सर्व वकिलांसाठी प्रेरणादायी आहे.वेगवेगळ्या निकालांत न्यायदान करताना त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. यामुळे कायद्याची सुरक्षितता आता भूषण गवईंसारख्या हुशार व्यक्तीच्या हातात आहे, याबद्दल विश्वास वाटतो. भारताच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे भूमिपुत्र म्हणून न्या. भूषण गवई हे विराजमान झाले आहेत, हा क्षण अभिमानास्पद आहे.
- अॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख,
अध्यक्ष, बार काऊन्सिल महाराष्ट्र आणि गोवा
अतिरिक्त सरकारी वकील मुंबई उच्च न्यायालय, मुंबई