सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सप्तसुत्री
08-Jan-2025
Total Views |
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन (ईज ऑफ लिव्हिंग) सुकर व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadanvis ) यांनी राज्यातील सर्व अधिकार्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. यासाठी येत्या १०० दिवसांत प्राधान्याने करावयाच्या कामांसाठी त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या १०० दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या.
“या सूचनांवरील कार्यवाहीबाबत दि. १५ एप्रिल रोजी आढावा घेतला जाईल,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते.
“आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करावे, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल, अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावे, शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावी, शासकीय कार्यालयात येणार्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करावे. अधिकार्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे,” आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
“नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे, यासाठी किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावे. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करावा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील, याची माहिती फलकावर नमूद करा,” अशा सूचना त्यांनी दिल्या. “नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावे. पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी ‘लोकशाही दिना’सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावे,” असेही त्यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांना त्रास दिल्यास खबरदार
“राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही, तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. (ईज ऑफ वर्किंग) यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
“जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रम आणि प्रकल्पांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजे. यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत,” अशा सूचना त्यांनी दिल्या. “संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का, याबाबत लक्ष ठेवावे,” असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.