मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अर्ज न भरण्यासाठी नाना पटोलेंना उद्धव ठाकरेंनी फोन केला, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. नाना पटोले एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असे निश्चित झाले असताना ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि त्यांच्याऐवजी काँग्रेस नेते भूषण पाटील ही निवडणूक लढवणार आहेत.
याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, "नाना पटोलेंनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) अर्ज का भरला नाही? त्यांना कुणाचा फोन आला? अर्ज भरण्याच्या आधी त्यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी शरद पवारांशी संपर्क करायला सांगितलं. पण शरद पवारांशी त्यांचा संपर्क झाला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा जर असा अपमान होत असेल तर काँग्रेसने यावर विचार करायला हवं," असे ते म्हणाले.
"एक साधी एमसीएची निवडणूक लढवण्याची ताकदही जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार पटोलेंच्या मागे उभी करु शकत नसेल तर मग काँग्रेस महाविकास आघाडीत कशासाठी आहे? याविषयी विचार करायला हवा. त्यामुळे नाना पटोले काल एमसीचा फॉर्म का भरू शकले नाहीत? हे प्रामाणिकपणे सांगावं," असा सवालही राणेंनी केला आहे.