नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेच्या हंगामी सभापतीपदी भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. नव्या खासदारांनी महताब हे शपथ देतील. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्याविषयीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, लोकसभेचे सदस्य भर्तृहरी महताब यांची राज्यघटनेच्या अनुच्छेद ९५(१) अन्वये लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे लोकसभेच्या नव्या सदस्यांच्या शपथविधीमध्ये हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी घटनेच्या कलम ९९ अंतर्गत सुरेश कोडिकुन्निल, थलिक्कोट्टई राजुथेवर बालू, राधामोहन सिंह, फग्गनसिंह कुलस्ते आणि सुदीप बंद्योपाध्याय यांची नियुक्ती केल्याचीही माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांनी दिली आहे.
महताब हे ओडिशाच्या कटक लोकसभा मतदारसंघातून सात वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी बिजू जनता दलाला (बिजद) मोठा धक्का देत पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते विजयीही झाले.
हंगामी अध्यक्षपदी महताब यांच्या निवडीस काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. परंपरेनुसार सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदाराची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. अठराव्या लोकसभेत काँग्रेसचे के. सुरेश आणि भाजपचे विरेंद्र कुमार हे सलग आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. विरेंद्र कुमार आता केंद्रीय मंत्री असल्याने के. सुरेश यांची हंगामी अध्यक्षपदी निवड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सातवेळा खासदार झालेल्या महताब यांची त्या पदावर निवड झाली असल्याचे काँग्रेसचे माध्यमप्रमुख जयराम रमेश यांनी म्हटले आहे.