मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असतानाच बाबरी ढाच्याचा (Babri Dhacha) उल्लेख वारंवार समोर येत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा चौकात विशाल जनसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणादरम्यान 'बाबरी झिंदाबाद'चे नारे लगावले आहेत.
भाजपचा ४०० पारचा नारा म्हणजे संविधान संपवण्याची भूमिका असल्याचा अजब दावा असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी केला. एवढ्यावरच न थांबता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी पुन्हा आले तरी ते संविधान बदलू शकत नाहीत, असे विधानही ओवैसींनी केल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे जाहीर भाषणांत बाबरीचा वारंवार उल्लेख करून त्याच्या झिंदाबादचे नारे लगावणे, ही बाब निश्चितच भविष्याच्या दृष्टीने चिंताजनक असून याबाबत अनेक सवाल सध्या निर्माण होत आहेत.
'...तर राम मंदिराचा निकाल फिरवू'; राहुल गांधींनी वक्तव्य केल्याचा मोठा दावा
अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय सत्तेत येताच उलटून टाकला जाईल. ही काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधींची भूमिका असल्याचा मोठा दावा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या निकटवर्तीयांसह झालेल्या एका बैठकीत, जर आगामी निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आल्यास ते एक शक्तिशाली न्यायिक आयोग स्थापन करतील आणि राजीव गांधींनी ज्याप्रमाणे शाहबानोचा निर्णय उलटवला होता, त्याचप्रमाणे राममंदिराचा निर्णयही उलटून टाकला जाईल, असे आचार्य प्रमोद कृष्णन यांनी म्हटले होते.