मुंबई : आम्ही हिंदूंना उद्धव ठाकरेमुक्त करणार आहे, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. संजय राऊतांनी सामनासाठी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. यावरुन राणेंनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आपल्या घरातल्या कामगाराला बसवून बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हाला राम मंदिर भाजपमुक्त करायचं आहे. त्याचप्रमाणे आम्हालाही हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचं आहे. ठाकरे आणि त्यांची टोळी जो हिंदुंचा द्वेष करत आहेत. त्यांना थांबवण्याचं काम या देशाची जनता निश्चितपणे करेल," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "जनतेने कर्नाटकमध्ये काँग्रेस निवडून आल्यावर काय झालं ते पाहावं. उद्या इंडी आघाडीला मतदान केल्यावर तुम्हाला भारताच्या नाक्या नाक्यावर पाकिस्तानचे झेंडे दिसतील. आज आपण रामभक्त म्हणून घराबाहेर भगवे झेंडे फडकवत आहोत तीसुद्धा परवानगी आपल्याला मिळणार नाही. महाविकास आघाडीच्या कालावधीत एकीकडे कोरोनाच्या नावाने सगळ्या सणांवर बंदी घातली आणि दुसरीकडे, मोहरम आणि ईदच्या जोरदार मिरवणूका निघत होत्या. उद्या इंडी आघाडी आणि महाविकास आघाडीचे नेते निवडून आल्यावर तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे इंडी आघाडी आणि मविआला मत म्हणजे लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आणि वक्फ बोर्डाच्या समर्थकांना मत. या सर्व गोष्टींचा विचार करुन मतदारांनी मतदान करावं," असे आवाहन त्यांनी केले.