शिवसेना ते उबाठा व्हाया मनसे! कोण आहेत ठाकरेंच्या कल्याणमधील उमेदवार वैशाली दरेकर?
03-Apr-2024
Total Views |
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु असताना उबाठा गटाने नुकतीच चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ते उबाठा गट व्हाया मनसे असा प्रवास करणाऱ्या वैशाली दरेकर कोण आहेत? हे जाणून घेऊया.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लोकसभेच्या चार जागांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कल्याण, हातकणंगले, पालघर आणि जळगाव या जागांचा समावेश आहे. उबाठा गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हातकणंगलेतून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वैशाली दरेकर यांनी २००९ च्या लोकसभा निवडणूकीत कल्याणमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत जवळपास १ लाखांहून अधिक मते मिळाली होती. त्याआधी त्या शिवसेनेत होत्या. त्यानंतर वैशाली दरेकर आता परत मनसेतून शिवसेनेत आल्या असून त्यांना उबाठा गटाने कल्याण लोकसभेचे तिकीट दिले आहे. दरम्यान, कल्याणमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा राहिल्यास याठिकाणी शिंदेंची शिवसेना विरुद्ध उबाठा गट असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.