मुंबई : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी १० सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला. त्यासोबत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख 'बनावटी नेते' असा केला. एका मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, “जेव्हा मते गोळा करण्याची वेळ येते तेव्हा काँग्रेसचे लोक भारत जोडो यात्रा काढतात. कर्नाटक निवडणुका संपल्या की ते 'इंडिया' झाले.
पुढे बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "ते म्हणतात की आता आम्ही इंडिया आहोत. मी त्यांना सांगितले की ते बनावटी नेते आहेत. सर्वप्रथम, गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. मग तुम्ही गांधी आडनाव बळकावले आणि तुम्ही सगळे बनावटी गांधी बनलात".
हिमंता बिस्वा सरमांनी काँग्रेसचा पहिला घोटाळा म्हणजे नाव चोरणे आहे, असा दावा केला. ते म्हणाले की, भारतातील पहिला घोटाळा हा 'नाव चोरणे' हा होता. त्यांना देश बळकावून इंडिया बनवायचा आहे. उद्या एखाद्या डाकूने गांधींचे आडनाव घेतले तर तो साधू होईल का? इंडिया हे नाव घेऊन तुम्ही पाप केले आहे कारण तुम्ही भारताला गौरव मिळेल असे काहीही केले नाही. किमान राहुल गांधींनी 'गांधी' हे आडनाव सोडून द्यावे ही नम्र विनंती. तेही चोरीचे आडनाव आहे."