नागपूर : मराठी साहित्यातील सुप्रसिध्द समीक्षक डॉ. किशोर सानप यांचे दि.२१ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागपूर येथील निरामय रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या निरामय रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी ११ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्व एका समीक्षकास मुकलं आहे. डॉ. सानप यांचा संत साहित्याचा गाढा अभ्यास होता. त्याचबरोबर त्यांनी गोंदिया येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले होते. तसेच २०१७ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूकही डॉ. किशोर सानप यांनी लढविली होती. परंतु, त्यात डॉ. सानपांना पराभव स्वीकारावा लागला.
कोण होते डॉ. किशोर सानप?
- मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ समीक्षक
- विदर्भ साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
- राजुरा येथे भरलेल्या दुसऱ्या अभंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
- साहित्यव्रती २०१५ पुरस्काराने सन्मानित
- ऋतू (कवितासंग्रह), हारास, पांगुळवाडा (कादंबरी), तसेच इतर साहित्यसंपदा