मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचा दाखल देत उद्धव ठाकरेंच्या शरद पवारांनी दाखवून दिलेल्या मर्यादांचा उल्लेख केला. "ठाकरेंना गोष्टींचा अंदाजच येत नसे!" हे पवारांच वाक्य फडणवीसांनी निदर्शनास आणुन दिलं.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी आणि २०१९चं सरकार याबद्दल 'लोक माझे सांगाती'च्या सुधारीत आवृत्तीमध्ये भाष्य केलं आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचं मंत्रालयात दोनदा जाणं, पक्षात बंड होत असतांना लक्ष नसणं आणि इतर मुद्द्यांवर लिहिलं आहे. हेच १० मुद्दे घेऊन फडणवीसांनी ठाकरेंना निशाणा केला.
पवारांच्या पुस्तकातील फडणवीसांनी सांगितलेले १० मुद्दे :
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरेंबाबत नव्हती.
- उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तमबातमी नसे, जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती.
- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हांला नव्हती.
- कुठे काय घडतंय, याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष नसे.
- उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची, याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं, ते नव्हतं.
- त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं. ते टाळता येणं त्यांना जमलं नाही.
- महाविकास आघाडीचं सरकार कोसळत असतांना त्यांनी संघर्ष न करता पहिल्याच टप्प्यात माघार घेतली.
- उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते परंतु ऑनलाईन पद्धतीने.
- दुसरीकडे राजेश टोपे, अजितदादा आणि इतर मंत्री प्रत्यक्ष प्रशासनाच्या संपर्कात होते.
- उद्धव ठाकरेंचं फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडले नव्हते.