नाल्यालगतच्या झोपडपट्ट्यांना 'सुरक्षा कवच'

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा निर्णय

    21-Nov-2023
Total Views |
Atul Save news

मुंबई : मुंबईतील नाल्यालगतच्या झोपडपट्ट्यांना 'सुरक्षा कवच' पुरवण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घेतला आहे. त्यामुळे डोंगर उतारावर, धोकादायक दरडीखाली राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.मुंबईत डोंगर उतारावर व उंच टेकड्यांवर झोपडपट्टया वसलेल्या आहेत. डोंगरांची होणारी झीज व दरडी कोसळल्याने झोपडपट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानीच्या घटना घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांना सुरक्षा पुरवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

झोपडपट्टयांमध्ये संभाव्य जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने घोषित वा अघोषित, अधिकृत वा अनधिकृत झोपडपट्टी असा फरक विचारात न घेता नाल्यालगतच्या सर्व झोपडपट्टीवासीयांच्या संरक्षणार्थ संरक्षक भिंती बांधण्यात याव्यात, असे निर्देश सावे यांनी दिले आहेत.त्यानुसार, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडून ९ मीटर उंचीच्या संरक्षक भिंती नाल्यालगत उभारल्या जातील. त्यासाठी नियोजन विभागामार्फत परस्पर सुधार मंडळास निधी उपलब्ध करून दिला जाईल. आवश्यक त्या ठिकाणी ९ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या संरक्षण भिंती बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा अन्य सुयोग्य यंत्रणेकडून करून घेण्यात येणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.