मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर धुमाकुळ घालत आहे. नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला डोक्यात चापट मारल्याबद्दल ट्रोल केले जात आहे. मात्र, आता नाना पाटेकरांनी या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. घडलेल्या संपुर्ण प्रकरणाचे स्पष्टीकरण नानांनी दिले आहे. मी असे कृत्य कधीच करत नाही. कोणालाच मी फोटो काढण्यासाठी मनाई करत नसल्याचे नानांनी म्हटले आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या आगामी 'जर्नी' चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी सध्या नाना पाटेकर वाराणसी येथे असून यावेळी ही घटना घडली.
काय म्हणाले नाना पाटेकर?
“एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मी एका मुलाला मारतोय. हा सीन आमच्या चित्रपटाचाच भाग आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. त्यात पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलून नकोस’ असं म्हणतो. त्यानंतर तो जातो. एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितलं. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला. मला माहीत नव्हतं की हा मुलगा कोण आहे, मला वाटलं आमच्या टीममधला आहे. त्यामुळे सीननुसार मी त्याला मारलं आणि माझा डायलॉग म्हटला. नंतर मला कळालं की हा आमच्या टीममधला माणूस नाही. मग मी त्याला बोलवायला जात होतो, पण तो पळून गेला. त्याच्या मित्राने वगैरे हा व्हिडीओ शूट केला असेल.”
पुढे ते असे देखील म्हणाले की, “मी कधीच कुणाला फोटोसाठी नाही म्हटलेलं नाही. मी इथेही हजारो फोटो काढले, तिथे वाराणसीत घाटावर खूप गर्दी असते. हे चुकून झालं, मला माहीत नाही तो कुठून आला, मी आमच्या टीमचा माणूस समजून रिहर्सलचा सीन शूट केला. या व्हिडीओमुळे कोणताही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा, मी असं कधीच कुणाला मारत नाही, आजपर्यंत मी कधीच असं केलेलं नाही. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे मी असं कृत्य कधीच करणार नाही. मी टीमला सांगितलं की त्याला बोलवा मी त्याची माफी मागतो. टीमने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडला नाही. तो रिहर्सलच्या मधे शिरला होता, त्यामुळे त्याला वाटलं असेल की हे लोक कदाचित आणखी मारतील, त्यामुळे तो पळून गेला असावा. पण खरंच मला माफ करा मी कधीच असं वागत नाही. घाटावर गर्दी शुटिंग करताना लोक खूप मदत करतात. आम्ही तिथे आणखी १०-१५ दिवस शुटिंग करणार आहोत,” असे स्पष्टीकरणँ नाना पाटेकर यांनी दिले.