मुंबई : अभिनेते भारत गणेशपुरे सादर करीत असलेले मानवेंद्र आर्टस् व व्ही आर प्रॉडक्शन निर्मित सत्य घटनेवर आधारीत एक स्त्रीपात्री दिर्घांक “आवर्त” हे नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार दि. १६ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे सादर होत आहे. निर्माती – दिग्दर्शिका रमा नाडगौडा यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले असून त्यांचे लेखन त्यांनी सुचरिता या नावाने केले आहे. त्यांना आलेल्या अनेक अनुभवातून व त्यांना जाणवलेल्या प्रश्नांवरून या कलाकृतीची निर्मिती झाली आहे. रमा नाडगौडा या स्वत: अभिनेत्री, लेखिका, कवियित्री असून अनेक मालिका, चित्रपट व नाटकात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या झी मराठीवर सुरू असलेली ‘तू तेव्हा तशी” या मालिकेत त्यांनी साकारलेली कावेरी आजी खूपच लोकप्रिय झाली आहे.
ईश्वरानं दिलेल्या सगळ्या सुखांवर प्रत्येकाचा हक्क असतोच. कुरूप काळ्या देहालाही मृदगंध भावतो, गुलाब आवडतो, पाऊस भिजवतो, देह हाकारतो आणि मन भुलवतं. माणसाचं रंग, रूप, स्थिती काहीही असो. सुखाचा अधिकार देवदत्त असतो. दैव आड येतं आणि मग सगळं जगणंच बिनसून जातं. अशाच एका सरी या नायिकेचा जीवनपट ‘आवर्त’ मध्ये उलगडण्यात आला आहे. अव्यक्त वेदनांना वाचा मिळाली नाही तर त्या घुसमटून मिळेल तो मार्ग शोधतात. अशाच एका कोंडीची ही गोष्ट आहे. आवर्त म्हणजे भोवरा, ज्यात अडकलेला जीव प्राणपणाने झुंजत रहातो. भोवऱ्यात गरगरून जाताना त्यातून बाहेर पडण्यासाठी सामान्य स्त्रीनं केलेल्या एकाकी संघर्षाची ही गाथा आहे. ही गोष्ट एका सरीची असली तरी ती प्रत्येकाच्या मनाला भिडणारी आहे. सरीच्या मनाचे अव्यक्त तुकडे, दबलेल्या भावना यांचे प्रतीक या रुपात एक स्वतंत्र व्यक्तिमत्व यात मांडण्यात आले आहे.
सत्य घटनांवर आधारित या नाटकाची संपूर्ण जबाबदारी स्वतः रमा नाडगौडा यांनीच सांभाळली आहे. अभिनेत्री शिवकांता सुतार यांनी यातील सरी ही मुख्य भूमिका साकारली आहे. सलग दीड तास, कोठेही कंटाळवाणे होऊ न देता एकपात्री नाटक सादर करणे हे एक मोठं आव्हान असते. शिवकांता सुतार यांनी आपल्या अभिनयाने ते आव्हान समर्थपणे पेलले आहे. स्त्रीच्या मनातील दबलेल्या भावना त्यांनी अत्यंत मार्मिकपणे सादर केल्या आहेत. शिवकांता सुतार हया अभिनेत्री व लेखिका असून अनेक चित्रपट, नाटक तसेच मालिकांमध्ये अभिनय व संवाद लेखन केले आहे. आत्तापर्यंत त्यांना जवळपास १० वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाले आहेत. अनिल नगरकर यांनी संदीप या पुरुष व्यक्तीरेखेसाठी समर्पक पार्श्वसंवाद म्हटले आहे. दादा परसनाईक यांनी संगीत दिले असून व्यवस्थापक राहुल पवार आणि सुत्रधार गोट्याकाका सावंत आहेत. अभिनेते भारत गणेशपुरे यांनी नाटकाचे निवेदन केले असून अभिनेते सयाजी शिंदे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी आणि अनिता दाते यांनी अभिप्राय दिला आहे. हे नाटक म्हणजे अनेक सरींच्या आयुष्याची ही सरासरी आहे. त्यातून कुणीही स्वतःला वजा करू शकत नाही. वरवर संथ भासणाऱ्या जगण्याला आतून पोखरत जाणाऱ्या ह्या भोवऱ्यात डोकावून पाहिलं की आरसा दिसतो. त्यातलं प्रतिबिंब पहाण्यासाठी हे नाटक आवर्जून पहा.