विश्वास परूळेकर हे डॉ बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जागवत विविध स्तरावर सामाजिक कार्य करत आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घैतलेला आढावा...
परुळे हे कोकणातल्या राजापूर तालुक्यातील छोटेसे गाव. स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीत गावातील जीवन कष्टप्रद होते. तुटपुंजी जमीन, इतर रोजगारांचा वणवा यामुळे गावातील अनेक तरुण रोजगारासाठी गावाबाहेर पडू लागले. गावाकूसाबाहेर राहाणार्या वंचित कुटुंबाची स्थिती तर आखणीनच दयनीय होती. या परिस्थितीत १९२८साली धाकाजी हिराजी परुळेकर यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षी रोजगारासाठी त्यांचे कुटुंबीय कराचीला स्थलांतरित झाले. धाकाजींचे शालेय शिक्षण कराची येथे झाले. तरुण वयात धाकाजींनी फाळणीचा दाहक अनुभव घेतला. ते आणि त्यांचे कुटुंबीय कसेबसे भारतात आले व त्यांनी मुंबईमधील ठक्कर बाप्पा कॉलनीच्या छावणीत आश्रय घेतला. आयुष्यात अनेक संकटं आली, पण महामानव डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना आदर्श मानत धाकाजी आणि डॉ. विश्वास यांनी अखंड सेवा कार्य सुरू केले.
धाकाजी छोट्या मोठ्या नोकर्या करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पुढे ते भारतीय रेल्वेमध्ये खलाशी म्हणून रुजू झाले. राहायला स्वत:चे घर नव्हते. सुरुवातीला ते पोट भाडेकरू म्हणून या मुंबईत राहिले. डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेले धाकाजी यांनी स्वत:च्या घराची सोय मुंबईत केली, पण त्याचबरोबर असंख्य दलित आणि वंचित लोकांना त्यांनी त्यांच्या हक्काचे घर मिळवून दिले. झोपडपट्टी आणि चाळीत राहाणार्या गरीब आंबेडकरी जनतेसाठी त्यांनी भांडुप आणि मुलुंड येथे अनेक गृहनिर्माण संस्था स्थापन करुन, हक्काची घरे उभी केली. जे. एल. तांबे यांच्या साथीने धाकाजी यांनी भांडुपमध्ये ‘आनंदधाम’, ‘जय यशवंत सोसायटी’, मुलुंडमध्ये ‘तांबे नगर’, ‘विश्वसहकार सोसायटी’ असे मोठे सहकारी गृहसंकुल उभे केले. गरीब जनतेला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी ‘रविकिरण क्रेडीट सोसायटी’ची स्थापना केली. समाजकार्य करताना त्यांना आपल्या तीन मुली आणि तीन मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात नावारुपाला आणले. डॉ. विश्वास हे प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.
डॉ. विश्वास यांचे बालपण भांडुप येथील ‘आनंदधाम सोसायटी’त गेले. १९८८ साली त्यांनी ‘सेठ जी.एस.मेडिकल कॉलेज, केईएम हॉस्पिटल मुंबई’ येथे त्यांनी प्रवेश घेतला. १९९७ साली ते ‘एम.डी.’ झाले. सुरुवातीस काही काळ त्यांनी भिवंडी येथे प्रॅक्टिस केली. ‘फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेत मानद स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. तेथे त्यांनी पाच हजारांच्यावर ‘फॅमिली प्लानिंग’च्या शस्त्रक्रिया केल्या. २००४ साली त्यांनी ऐरोली येथे ‘परुळेकर सर्जिकल आणि मॅटर्निटी होम’ चालू केले. अल्पावधीतच हे हॉस्पिटल नावारुपाला आले. २०११ साली डॉ. विश्वास यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये ‘टेस्टट्युब बेबी सेंटर’ सुरू केले. आता पर्यंत ५०० ‘टेस्टट्युब बेबीं’ना त्यांनी या जगात आणले.
व्यावसायिक व्यस्तता सांभाळून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी देखील जपली. २०१४ मध्ये ते क्लबचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षीय काळात आंतरराष्ट्रीय रोटरीमधील १ कोटी रुपयांच्या ग्लोबल अॅवॉर्डसाठी त्यांनी आदरणीय सिंधुताई सकपाळ यांचे नामांकन भरले. त्याचे प्रभावीपणे सादरीकरण केले. त्या वर्षीच्या ग्लोबल अॅवॉर्डच्या सिंधुताई मानकरी ठरल्या. हाँगकाँग मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात त्यांनी सिंधुताईंच्या दुभाष्याची भूमिका निभावली. आंबेडकरी चळवळीतील माणूस आपली सामाजिक बांधिलकी विसरत नाही. डॉ. विश्वास यांचे वडील धाकाजी यांनी झोपडपट्टीत राहणार्या अनेक आंबेडकरी कुटुंबाना चांगल्या वस्तीत घर निर्माण करुन दिले. त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. निवृत्तीनंतर त्यांनी परुळे येथे ‘कपील अॅ्ग्रा’े कंपनीची स्थापना केली. ‘अमुल डेअरी’सारखी मोठी सहकारी चळवळ उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते, परंतु ग्रामीण समाजाचा त्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, तरीपण नाउमेद न होता ते ग्राम विकासाचे काम निरंतर करत राहिले. त्यांचाच वारसा डॉ. विश्वास यांनी घेतला.
आपल्या व्यस्त वैद्यकिय व्यवसायातून वेळ काढून ते महिन्यातून एकदा आपल्या मूळ गावी जाऊन तेथे वैद्यकीय शिबीर भरवितात. या शिबिरास आसपासच्या अनेक गावातील लोक येतात. डॉक्टरांनी काही स्थानिक नागरिकांना आरोग्य रक्षक म्हणून प्रशिक्षित केले. या आरोग्यरक्षकांकडे प्राथमिक लक्षणाची काही औषधे देऊन ठेवली आहेत. दोन दिवसांत आराम न पडल्यास रुग्णास जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देतात. परुळे आणि आसपासच्या गावात आजही सरकारी आरोग्य केंद्र हे १० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट नाही. अशा परिस्थितीत गावकर्यांना या आरोग्यरक्षकांचा फार मोठा आधार वाटतो. सध्या चार गावांमध्ये डॉक्टरांनी असे आरोग्य रक्षक प्रशिक्षित केले आहेत. आपल्या मासिक व्हिजीटमध्ये डॉक्टर त्यांना मुंबईवरुन औषधे घेऊन जातात, त्यांच्या कामाचा आढावा घेतात व विविध गावात आरोग्य शिबिरे घेतात. कोरोनाच्या महामारी दरम्यान.
आज गरीब जनतेला व ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सुविधा पाहिजेत. त्यांना मोठ्या अद्यावत हॉस्पिटलशी, अद्यावत उपचारांशी काही देणे घेणे नाही. वैद्यकीय उपचारातील असमतोलच कोरोनासारखी महामारी भारतात झपाट्याने पसरण्यास कारणीभूत ठरला. या पार्श्वभूमीवर डॉ. विश्वास यांचे कार्य डोळ्यात भरण्यासारखे आहे. गावातील हुशार विद्याथ्यार्ंंना गरिबीमुळे पुढे शिक्षण घेता येत नाही. अशा काही मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च डॉ. विश्वास करतात. खेडेगावातील साक्षी ही चुणचुणीत मुलगी. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. डॉक्टरांनी तिला मुंबईला आणले व तिचे शिक्षण पुढे चालू ठेवले. परुळेकर कुटुंबीयांची ही सामाजिक बांधिलकी खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. स्वत:च्या व्यस्त वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून ते ऐरोली व आपल्या गावाकडल्या गरीब कुटुंबांना मदत करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करतात. आज समाजापुढे उत्तम रोल मॉडेल फार कमी निर्माण होतात. सर्वत्र भ्रष्ट, गुंड मवाली, व्यभिचारी रोल मॉडेलचा सुळसुळाट झाला आहे. तरुण पिढी नकळत या अवैध मार्गाकडे ओढली जाते. या पार्श्वभूमीवर आंबेडकर चळवळीतून प्रेरणा घेऊन कार्य करणार्या डॉ. विश्वास यांची सामाजिक बांधिलकी डोळ्यात भरण्यासारखी आहे. डॉ. विश्वास यांच्या भावी वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा!
- मिलिंद शेजवळ