एस-४०० एअर डिफेन्स प्रणालीमुळे शत्रूचा मारा सीमेवरच थांबवता येणार

Total Views |

 

मुंबई : एस-४०० एअर डिफेन्स प्रणाली हे जगातिल सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम आहे. याव्यतिरिक्त ती एक मोबाईल सिस्टम आहे. शत्रूकडून हवाई मार्गाने होणारा हल्ला त्यांच्याच क्षेत्रात किंवा सीमेवर थांबवण्यासाठी ही एअर डिफेन्स प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.बी.शेकटकर यांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना दिली. शत्रूच्या विमानाद्वारे किंवा क्षेपणास्त्राद्वारे हवाई मार्गाने होणारे हल्ले त्याच ठिकाणी थांबवण्याची क्षमता एस-४०० मध्ये असल्याचे भारताची प्रतिकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे ते म्हणाले. 
 

एस-४०० हे क्षेपणास्त्र आपल्याकडे आल्यास शत्रूकडून मारा झाल्यास त्याला सीमेवर किंवा शत्रूच्या जागेवर त्याला उध्वस्त करता येईल आणि ही या क्षेपणास्त्राची गुणवत्ता आहे. पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही शत्रू देशांकडून जर अशा प्रकारचा हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी या क्षेपणास्त्राची आपल्याला आवश्यकता असल्याचे शेकटकर म्हणाले. २१ व्या शतकात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. त्यातच शत्रूंची विमाने आपल्या क्षेत्रात येऊन हल्ला करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यांना आपल्या क्षेत्रात येऊ न देण्यासाठी आपण एस-४०० क्षेपणास्त्र रशियाकडून खरेदी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

रशिया आपला हितचिंतकरशिया हा आपला जुना मित्र आणि हितचिंतकर आहे. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये वापरण्यात आलेली बहुतांश सामग्री रशियात तयार करण्यात आलेले होते. त्यावेळी अमेरिका आपल्याला आपल्याला युद्ध सामग्री देत नव्हता. त्यांना आपल्या युद्ध शक्तीवर शंका होती. मात्र, आता त्या मानसिकतेत फरक पडला असल्याचे शेकटकर यांनी नमूद केले.

 

हा करार पूर्वीच केलेला : कॅटसा कायद्यांतर्गत अमेरिकेने रशियावर काही निर्बंध घातले आहेत. भारतानेही आपली भूमिका स्पष्ट करत या कायद्याचा भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर विचारले असता शेकटकर म्हणाले, की रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स प्रणली खरेदी करण्यासाठी फार पूर्वीच करार करण्यात आला आहे. अमेरिकेने निर्बंध घालण्यापूर्वीच हा करार झालेला आहे. परंतु भारताने यात कठोर भूमिका घेत आपण तो करार मोडू शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी संध्याकाळी या करारावर स्वाक्ष-या होणार असून कोणत्याही प्रकारची युद्धसामग्री घ्यायची असल्यास त्याला काही वर्षांचा कालावधी लागत असतो. आपण या कराराच्या अगदी जवळ असल्यामुळे आपण अमेरिकेला हा करार मोडणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

एस-४०० मध्ये काय आहे विशेष ?

·  ही एक जगातिल अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे

·  हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटर पर्यंत मारा करण्यास सक्षम असून ३० किलोमीटर पर्यंतच्या उंचीवरदेखील हे क्षेपणास्त्र मारा करू शकते.

·   हे एक विमानभेदी क्षेपणास्त्र आहे

·  हवाई संरक्षण प्रणालीचा महत्त्वाचा भाग असून २००७ मध्ये हे रशियाच्या ताफ्यात सामिल करण्यात आले.

·  यामध्ये अमेरिकेच्या अत्याधुनिक फायटर जेट एफ-३५ चा मारा हाणून पाडण्याची क्षमता आहे.

·  याद्वारे एका वेळी तीन क्षेपणास्त्र डागता येऊ शकतात.

·  पाकिस्तान आणि चीनच्या अण्विक मारादेखील हे क्षेपणास्त्र हाणून पाडू शकते.

 

आज करार होणार : दि. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असून याचवेळी या करारांवर स्वाक्ष-या करण्यात येणार आहेत. परंतु यामध्ये अमेरिकेकडून अडथळा आणण्याची शक्यतादेखील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. रशियाशी संरक्षण आणि इंटेलिजन्स क्षेत्रात करार करणा-यांवर निर्बंध घालण्यात येतील असे अमेरिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे भारताच्या या करारानंतर अमेरिका काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

चीनशी टक्कर : चीनकडे यापूर्वीपासून ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे. मात्र, या करारानंतर भारतालाही ही क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार असून भारताच्याही संरक्षण क्षमतेत वाढ होणार आहे. चीननेदेखील रशियाकडून यापूर्वी ही प्रणाली खरेदी केली होती. सध्या चीनची सैन्य या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करत आहे.

 

पुतीन ८ वेळा भारतात : पुतीन हे २००० साली रशियाचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर त्यांनी तीन कार्यकाळ पूर्ण केले आहेत. आता त्यांचा चौथा कार्यकाळ आहे. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना ते पहिल्यांदा भारत दौ-यावर आले होते. तेव्हापासून ते ८ वेळा भारतात आले आहेत. ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांचा शेवटचा भारत दौरा झाला. यावेळी त्यांचा ९ वा भारत दौरा आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121