जागतिक एआय प्रवास भारताशिवाय अपूर्ण! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
01-Mar-2025
Total Views | 28
मुंबई : जागतिक एआय प्रवास भारताशिवाय अपूर्ण आहे, असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवार, १ मार्च रोजी व्यक्त केले. मुंबई टेक वीक २०२५ मध्ये ते बोलत होते.
मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, "जागतिक एआय प्रवास भारताशिवाय अपूर्ण आहे. भारतासाठी एआय हे दीर्घकालीन धोरण असून ते आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमध्ये महत्त्वाचा भाग आहे. एआय हे परिवर्तनकारी तंत्रज्ञान असले तरीही मानवी बुद्धिमत्ता नेहमीच त्यापेक्षा वरचढ राहील. चुकीच्या डेटावर प्रक्रिया केल्यास एआय चुकीचे निष्कर्ष काढू शकतो, त्यामुळे मानवी देखरेख आवश्यक आहे. भारतातील ४३% STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) पदवीधर महिला आहेत आणि त्या एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत," असे ते म्हणाले.
मुंबई हे वेगाने वाढणारे एआय केंद्र आहे. स्टार्टअप्स आणि टेक उद्योजकांनी एआय-आधारित उपाय विकसित करावे. एआय भारताच्या मुक्त व्यापार करारांमध्ये आणि धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. एआय हा कृत्रिम आहे, तो मानवी मेंदूने निर्माण केलेला आहे आणि मानवी मेंदू नेहमीच त्याच्या पुढे राहील. एआयमध्ये भावना नसतात आणि चुकीच्या डेटावर तो चुकीचे निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे एआयच्या विकासात मानवी सहभाग अनिवार्य आहे," असेही त्यांनी सांगितले.