संजय राऊत! तुम्ही फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीचं भलं केलं; स्वतःचं वाटोळं केलंत!
09-Aug-2024
Total Views | 67
यवतमाळ : तुम्ही स्वत:चं नुकसान करुन फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं भलं केलं, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे. संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी शुक्रवारी यवतमाळ येथे माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "दाखवणं, बघून घेतो या भाषेचा आता लोकांना कंटाळा आला आहे. तुम्ही दाखवणार असाल तर आम्हीसुद्धा व्यवस्थित आमची तयारी केली आहे. एखादी खोटी गोष्ट लोकांसमोर वारंवार मांडली तर ती खरी वाटते. त्यामुळे आम्हाला थोडासा फटका बसला. महाराष्ट्रात त्यांच्या आणि आमच्या मतांमध्ये २ लाखांचा फरक आहे. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही आम्ही त्यांच्यापेक्षा दोन लाख मतांनी पुढे आहोत. ठाणे, कल्याणस पालघर, रायगड, रत्नागिरी हा सर्व पट्टा आम्ही जिंकलो. संजय राऊत याचा जरा अभ्यास करणार का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "कोकणामध्ये तुमची शिवसेना उभी राहिली. कोकणातला माणूस इकडे काम करायला आला आणि तो तुमचा मतदार झाला. मग तुम्ही मुंबई आणि कोकण दोन्ही जिंकलं. आता त्या कोकणातून तुम्ही साफ झाला आहात. काँग्रेसच्या १ जागेच्या १३ जागा आणि शरद पवार गटाला ८ जागा देऊन तुम्ही तुमचं नुकसान केलं. संजय राऊत. तुम्ही १८ चे ९ झालात आणि स्वत:चं नुकसान केलं. एकनाथ शिंदेंना तुमच्यापेक्षा जास्त मतं मिळाली. तुम्ही फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं बरं केलं. बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शुभेच्छाही दिल्या नाहीत त्यांना तुम्ही सोन्याच्या आणि चांदीच्या ताटात देत आहात," असा घणाघात त्यांनी केला आहे.