नवी दिल्ली : झारखंड पोलिसांनी दि.१४ जून २०२४ रोजी हजारीबाग जिल्ह्यातील हिंदू कार्यकर्ते अमन कुमार उर्फ अमन बाबाला अटक केली. अमनवर दि. १२ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीसाठी मिरवणूक काढल्याचा आरोप आहे. बरकागाव-महुडीमध्ये गेल्या ४० वर्षांपासून रामनवमीची मिरवणूक कधीच निघाली नव्हती, मात्र यंदा अमनने ही मिरवणूक काढली होती. त्यामुळे काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या पोलिसांनी अमन आणि इतर अनेक लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
अमनच्या अटकेनंतर त्याच्या आईने सांगितेले की, रस्त्याच्या जागेवरून झालेल्या वादामुळे बरकागावमध्ये गेल्या ४० वर्षांपासून रामनवमीची मिरवणुक होत नव्हती.पण यावेळी अमनने रथ बांधला आणि तो हजारीबाग ते रांचीपर्यंत स्वतःच्या हातांनी ओढला. दरम्यान सरकार आणि काही नेत्यांना अमनची लोकप्रियता पचनी पडली नाही, असे त्याच्या आईचे म्हणणे आहे. प्रशासनाने मिरुवणुक रोखण्यासाठी सर्व तयारी केली होती ज्यासाठी अमनला एप्रिल २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. प्रशासनाने मार्गावर बॅरिकेड्स लावून पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी पोलीस आणि भाविकांमध्ये झटापट झाली. वाहनांची तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली, त्यात काही लोक जखमी झाले.
तेव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कुलदीप कुमार यांनी मिरवणूक निघाली नसल्याचा दावा केला होता. पूजा करण्याच्या नावाखाली काही लोकांनी वादग्रस्त मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले होते. याच प्रतिबंधित मार्गाने मिरवणूक निघाली होती, मात्र परतीच्या वेळी पोलिसांनी अडवल्याचे सांगितले जात आहे. ही नाकाबंदी पाहून भाविक संतप्त झाले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. संतप्त लोकांनी दगडफेक करून काही झोपड्या पेटवल्या.
मुस्लिमबहुल बरकागाव माहुडीमध्ये १९८५ पासून हिंदूंची मिरवणूक निघत नाही. त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून हा आदेश जारी करण्यात आला, त्याची अंमलबजावणी अजूनही सुरू आहे. ही बंदी मोडण्यासाठी हिंदू कार्यकर्ते अनेकदा प्रयत्न करतात. २०१७ मध्ये भाजप नेते यशवंत सिन्हा यांना त्यांच्या सुमारे १०० समर्थकांसह या मार्गाने नवरात्री मिरवणूक काढायची होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या समर्थकांसह अटक केली. त्यावेळीही शोभा यात्रेत सहभागी झालेल्या लोकांची पोलिसांशी झटापट झाली होती.