नवी दिल्ली : भाजपने सहाव्या टप्प्यामध्येच हवे ते साध्य केले आहे. त्यामुळे आता सातव्या टप्प्यानंतर जे जे सांगितले, ते ते सर्व साध्य होणारच; असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाराणसी येथे व्यक्त केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघामध्ये प्रचार केला.
यावेळी ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या सहा टप्प्यांमध्ये जे हवे होते, त्याच्याही पुढे भाजपला यश मिळाले आहे. आता सातव्या टप्प्यानंतर जे जे काही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत, ते ते सर्व साध्य होणार आहे, यात कोणतीही शंका नाही.
वाराणसी ही भगवान काशी विश्वनाथांची पुण्यभूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची या नगरीचा कायापालट केला आहे. येथे मोठ्या प्रमाणात विकास होत असून ते पाहून संपूर्ण जगभरातील लोक काशीत येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच वाराणसीत तर प्रचाराची गरजच नाही. कारण येथील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देण्यासाठी इच्छुक आहे.
त्याचप्रमाणे भाजप आपल्या मतदारांनाच सर्वौपरी मानत असल्याने जनतेपर्यंत जाणे ही भाजपची संस्कृती आहे. काशीच्या जनतेनेही ठरवले आहे की कोणी प्रचाराला आले नाही तरीदेखील पंतप्रधान मोदींनाच जनता आपला आशीर्वाद देणार आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.