कट्टर हिंदुत्ववादी असण्यापेक्षा भूमातेशी एकनिष्ठ रहा : डॉ. धनश्री लेले
28-May-2024
Total Views | 88
ठाणे : "हिंदुत्ववादी शब्दाला कट्टर शब्द जोडण्याची गरज नाही. हिंदू हा आपल्या हिंदुत्वाशी एकनिष्ठ असतोच. परंतु भूमातेशी एकनिष्ठ राहण्याची खरी गरज आहे.", असे प्रतिपादन स्वा. सावरकर अभ्यासक डॉ. धनश्री लेले यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि.२८ मे रोजी ब्राह्मण सभा, ठाणे तर्फे डॉ.धनश्री लेले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तुरुंगातील कविता' या विषयावर त्यांनी उपस्थित सावरकर प्रेमींना संबोधित केले. ब्राह्मण सभा, श्री कोपिनेश्वर मंदिराजवळ, ठाणे (प) येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ब्राह्मण सभेचे प्रमुख विश्वस्थ विलास जोशी, अध्यक्षा अनुराधा जोशी, कार्याध्यक्ष रवींद्र कराडकर यांच्यासह अनेक सावरकर प्रेमी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तुरुंगातील कविता उलगडताना डॉ. धनश्री लेले म्हणाल्या, "सावरकरांविषयी बोलायचं म्हणजे क्षितिज रेषेला स्पर्श करण्यासारखं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विशेष पैलू म्हणजे ते बुद्धिनिष्ठ सुधारक, क्रांतिकारक आणि कवी होय. सावरकरांच्या साधारण ९५ टक्के कविता राष्ट्रीयत्वाकडे जाणाऱ्या आहेत."
पुढे त्या म्हणाल्या, "सावरकरांचं जीवन म्हणजे फिरता रंगमंच होता आणि त्या रंगमंचावर एकच नायक होता, तो म्हणजे विनायक. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. आज तब्बल १२ हजार काव्यांची त्यांची काव्यसंपदा आहे. सावरकरांनी लिहिलेल्या पूर्वीच्या कवितांमध्ये वृत्तबद्धता होती, तर तुरुंगातील कविता अंतर्मुख करणाऱ्या होत्या. त्यांना एखादा विषय भिडला की ते कवितेतून व्यक्त व्हायचे. सावरकरांच्या साहित्याचे वाचन प्रत्येकाने करणे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल."