मुंबई, दि.२२ : लोकसंवाद हे नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणे, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे योग्य निराकरण करणे आदींसाठी महत्वपूर्ण आहे. कामकाजामध्ये सुकरता येण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभागांनी आपापसांत उत्तम समन्वय ठेवावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवार, दि. २२ एप्रिल रोजी पार पडलेल्या समन्वय संवाद बैठकीप्रसंगी ते बोलत होते. मुंबई महानगरपालिकेच्या नियमित कामकाजांसोबत वेगवेगळे प्रकल्प आणि अन्य कामांसाठी विभागांमध्ये समन्वय असावा, या हेतूने आयुक्त गगराणी यांनी या समन्वय संवाद बैठकीचे आयोजन केले होते. प्रत्येक महिन्याच्या एका सोमवारी सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, संचालक, खातेप्रमुख यांची अशाप्रकारे समन्वय संवाद बैठक आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये त्यांना येणाऱ्या समन्वयनात्मक अडचणींवर तसेच नवकल्पनांवर चर्चा केली जाईल, हा या बैठकीच्या आयोजनामागील हेतू असल्याचे गगराणी यांनी बैठकीत नमूद केले. तसेच, या बैठकीत प्रशासनातील ज्या-ज्या विभाग / खात्यांकडे प्रलंबित, गुंतागुंतीचे वा अन्य कोणतेही प्रश्न असतील, तर ते वरिष्ठांसमोर आणावेत. प्रश्न, अडचणी तुंबून राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. असे प्रश्न, अडचणी यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यावर भर देण्यात येईल. त्यासोबत व्यापक जनहिताचे अभिनव प्रकल्प राबवावेत. नागरिकांसोबत संवाद वाढवून समस्या निकाली काढाव्यात, असे आयुक्त गगराणी यांनी नमूद केले.
अभिनव प्रकल्पातून नावलौकिक
विविध विभागांशी संबंधित अधिकाऱ्यांकडून सूचना, नवकल्पना जाणून घेतल्यानंतर आयुक्त गगराणी यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिका ही जगभरात नावलौकीक प्राप्त संस्था आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजवरच्या १५० वर्षांच्या कार्यकाळात तत्कालीन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय, राबविलेल्या अभिनव प्रकल्पांमुळे हे नावलौकिक आहे. संबंधित प्रकल्प उभारणाऱ्या तत्कालीन अधिकाऱयांचे नाव आजही स्मरण केले जाते. याच धर्तीवर विद्यमान अधिकाऱ्यांनी जनहित लक्षात घेऊन आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या मदतीने किमान एकतरी असा अभिनव प्रकल्प सुरू करायला हवा. जो दीर्घकाळ टिकेल, दूरदृष्टीचा प्रकल्प म्हणून ओळखला जाईल. जेणेकरून निवृत्तीनंतर आपण अभिमानाने सांगू शकलो पाहिजे की, हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात राबवला गेला. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक-एक विभाग राज्यातील काही महानगरपालिकांच्या संपूर्ण कायक्षेत्रापेक्षाही मोठा आहे. येथील कोणत्याही विभागांमध्ये कामकाजात भेडसावणाऱ्या छोट्यामोठ्या समस्यांवर विसंवाद राहता कामा नये. योग्य समन्वय आणि सुसंवादाने बरेचसे मुद्दे सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे, संपूर्ण प्रशासनाने उत्तम समन्वय आणि सुसंवाद ठेवावा, असे आवाहनही गगराणी यांनी केले.