मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनासाठी वेग मर्यादा निश्चित
21-Apr-2024
Total Views | 61
नवी मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घाट क्षेत्रामध्ये वेग मर्यादा वेगळी असून, उर्वरित मार्गावर वेगळी वेग मर्यादा असणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामध्ये कार, बस आणि अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. या मार्गावर धावणारी अनेक वाहने वेगमर्यादा पाळत नाहीत. मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील काही ठिकाणी १०० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेग मर्यादा आहे. मात्र, सदर वेग मर्यादा पाळली जात नाही. याउलट, वाहने केवळ १०० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने चालविली जातात. मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालक यांनी वाहनांची वेग मर्यादा निश्चित केली आहे.
वाहनांची निश्चित वेग मर्यादा
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील किलोमीटर क्रमांक-३५.५०० ते किमी ५२.०० दरम्यानचा भाग घाट क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तर उर्वरित भाग समतल भाग म्हणून ओळखला जातो. प्रवासी वाहनांमधून चालकासह आठ प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागामध्ये ताशी वेग मर्यादा १०० किमी आणि घाट क्षेत्रामध्ये ६० किमी अशी करण्यात आली आहे. प्रवासी वाहनांमधून चालकासह नऊ आणि त्यापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाणाऱ्या वाहनांसाठी समतल भागामध्ये ताशी वेग ८० किलोमीटर तर घाट क्षेत्रामध्ये ४० किलोमीटर अशी वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे. माल आणि साहित्य वाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागामध्ये वेग मर्यादा ताशी ८० किलोमीटर तर घाट क्षेत्रामध्ये ४० किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर समतल भागासाठी असलेली वेगमर्यादा १०० किमी प्रति तास असून, घाट भागामध्ये आल्यानंतर वेगमर्यादा ५० किमी प्रति तास आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर आता वाहन चालकांना वेग मर्यादेचे बंधन पाळावे लागणार आहे.