"हिम्मत असेल तर..."; आशिष शेलारांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान
19-Feb-2024
Total Views | 113
मुंबई : हिम्मत असेल तर द्या राजीनामा आणि वरळीतून पुन्हा निवडणुक लढवा, असे थेट आव्हानच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. आदित्य ठाकरेंनी ठाण्यात सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्याचे आव्हान दिले होते. यावर आता शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, "ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे करतात त्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प २० वर्षाहून अधिक काळ रखडले आहेत. तुमच्या काळात एकही विट रचली गेली नाही. वरळी गावठाण, कोळीवाड्यातील जनतेचे कोरोना काळात अतोनात हाल झाले ते दुनियेने पाहिले."
ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार श्री आदित्य ठाकरे करतात...
◆ त्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प 20 वर्षाहून अधिक काळ रखडलेत, तुमच्या काळात एकही विट रचली गेली नाही.
◆ वरळी गावठाण, कोळीवाड्यातील जनतेचे कोरोना काळात अतोनात हाल झाले ते दुनियेने पाहिले.
"कोस्टल रोडच्या खांबांमुळे वरळीच्या कोळी बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला ते टाहो फोडत होते, तेव्हा पालकमंत्री असताना तर कोळी बांधवांना भेटायला सुध्दा तुमच्याकडे वेळ नव्हता. वरळीच्या बीडीडी चाळींतील व्यवसायिक गाळे आणि रहिवाशांना पुनर्विकासीत घरे देणे तुम्हाला जमले नाही, त्यात जमेल तेवढा खोडाच घातलात. कोस्टल रोड तर तुमच्या काळात न्यायालयात अडकला. पोलीस वसाहतील पोलीसांना तुम्ही घरे देऊ शकला नाहीत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "वरळील जनता आजही शोध घेत आहे, आमदार कुठे हरवलेत? वरळीतून आता निवडून येणे शक्य नसल्याने, ठाण्यात जाऊन तोंडाच्या वाफा घालवणे सुरु आहे? रंगरंगोटीच्या नावाखाली वरळीतील चारदोन भिंतीना चुना लावून अशा प्रकारे वरळीतून पळ काढताय? हिम्मत असेल तर द्या राजीनामा आणि वरळीत आमच्या समोर या," असे थेट आव्हान आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.