नवी दिल्ली : ममताराजमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. कारण ममताराज असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत अमानवी अत्याचार करण्यात आला. तिचे डोळे काढून तिच्या स्तनांना कापून क्रूरतेची पातळी ओलांडण्यात आली. या घटनेबद्दल भाजप नेते अमित मालवीय यांनी ममता बनर्जींच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे.पीडिते मुलीच्या कुटुंबियांनी पीडितेचे डोळे काढून तिचे स्तन कापल्याचा आरोप केला आहे. या आरोपाच्या आधारे कुटुंबीयांनी कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेत आपल्या मुलीसोबत अतिशय अमानवी कृत्य केल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेचे शवविच्छेदन करून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ही कुटुंबियांनी केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंगाल पोलिसांनी दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी तिचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला.
तब्बल २० दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी कोलकाता येथील एसएसकेएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. या घटनेत पोलिसांनी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. चाचणीनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.किशोरवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्यानंतर आरोपी पिता-पुत्राने पीडितेच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात छिद्रे पाडली आणि त्यात ॲसिड टाकले, जेणेकरून मृतदेह लवकर कुजला जावा, असा आरोप आहे. तपास अहवालात या सर्व गोष्टींचा उल्लेख असला तरी पहिल्या पोस्टमार्टम अहवालात अशा क्रुरतेचा उल्लेख नव्हता. पोलिस तपास अहवाल, केस डायरी आणि शवविच्छेदन अहवालात वेगवेगळ्या गोष्टी होत्या.
हे संपूर्ण प्रकरण मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हरिहरपारा भागातील आहे. येथे १३ वर्षांची मुलगी पाच दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर त्याचा मृतदेह २७ जानेवारी २०२४ रोजी गावातील मोहरीच्या शेतात पडलेला आढळून आला. मुलीच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. त्याच्या गळ्यात एक फास होता आणि तिचे दोन्ही डोळे फुगले होते. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी वडील आणि मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.त्याचवेळी, एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुलगी घराबाहेर पडल्याचे म्हटले आहे. त्यानंतर ती परतली नाही. कुटुंबीय व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. मुलगी राहत असलेल्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिले होते, 'काळजी करू नका.' दुसऱ्या दिवशी घरापासून काही अंतरावर असलेल्या मोहरीच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला.गावातील एका तरुणाने लग्नाच्या बहाण्याने मुलीचे घरातून अपहरण केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर त्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा शारीरिक छळ करण्यात आला. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना आरोपी अल्पवयीन मुलाचे आणि त्याच्या वडिलांचे नावही सांगितले.मुलीचे डोळे काढण्यात आले आणि तिचे स्तन कापले गेले, असा कुटुंबाचा दावा आहे.
मुलीचे अपहरण करून शारिरीक छळ करून नंतर तिची हत्या करण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मात्र, मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी केलेला शवविच्छेदन अहवाल मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीशी किंवा पोलिसांच्या अहवालाशी जुळत नाही.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत कुटुंबीयांनी कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती जय सेनगुप्ता यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की, पहिला पोस्टमार्टम अहवाल आणि तपास अहवाल यात फरक आहे. त्यामुळे पीडितेच्या मृतदेहाचे दुसरे शवविच्छेदन आवश्यक आहे. हायकोर्टाने याप्रकरणी पोलिसांकडून केस डायरीही मागवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्च २०२४ रोजी होणार आहे.या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता पोलिसांनी मृतदेह कबरीतून बाहेर काढताना चोख बंदोबस्त ठेवला होता. चहूबाजूंनी कुंपणही लावण्यात आले होते.