मुंबई, दि.९ : मध्य रेल्वेच्या ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या हरवलेल्या व विसरलेल्या मौल्यवान वस्तू परत करण्याबाबत दाखविलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे आभार मानत कौतुक केले. मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा दलाने जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ याकाळात तब्बल ४.६० कोटी रुपयांच्या वस्तू आणि सामान शोधले व प्रवाशांना परत केले आहे.
दरम्यान, प्रवासादरम्यान प्रवाशांच्या पर्स, बॅग, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, क्रेडिट/डेबिट कार्ड यासारख्या मौल्यवान वस्तू गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर विसरल्याच्या आणि गहाळ झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. यांतील बहुतेक प्रकरणांमध्ये तक्रार नोंदवली गेली की नाही याची पर्वा न करता भारतीय रेल्वेच्या कर्मचारी वर्गाने तपासणी व शोधकार्य सुरू ठेवले आणि बहुतेक प्रकरणांमध्ये अतिशय तत्परतेने प्रतिसाद दिलेला आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त "अमानत" या ऑपरेशन अंतर्गत रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांना मदत करत आहे. चालू वर्ष जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, रेल्वे सुरक्षा दलाने सुमारे ४.६० कोटी रुपये किमतीचे १३०६ प्रवाशांचे सामान परत केले आहे.
विभागनिहाय तपशील :
विभाग किंमत प्रवाशी
मुंबई विभाग २.२८कोटी ५८०
भुसावळ विभाग १ कोटी २३०
नागपूर विभाग ५९.३८ लाख २९१
सोलापूर विभाग ३६.७५ लाख ९२
पुणे विभाग ३५.२२ लाख ११३