मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. सिंघम अगेन या चित्रपटासोबत टक्कर देत भूल भूलैय्या ३ ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला अवघ्या तीन दिवसांत जमा केला आहे. दरम्यान, कार्तिकने नुकताच चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी त्याच्यासोबत घडलेला एक विचित्र किस्सा सांगितला आहे.
कार्तिक आर्यनने कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्यासोबत घडलेला किस्सा सांगताना म्हटले की, 'ती एक मोठी हवेली होती, तिथे भरपूर अंधार होता, संपूर्ण वातावरण भयावह होते. शॉट घेण्याआधी मी कोणाशी तरी बोलत असताना अचानक मला मागून कोणीतरी ओरबाडलं! तृप्तीला वाटले की मी काहीतरी इम्प्रोव्हायझेशन किंवा अभिनय करत आहे पण मग मी म्हणालो, 'नाही यार, मला खरोखर काहीतरी ओरबाडल्या सारखे वाटते आहे.' पण जेव्हा मागे बघितले तेव्हा आमच्या मागे कोणीच नव्हते...”. हा किस्सा ऐकून सगळेच थक्क झाले होते.
‘भूल भूलैय्या ३’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ३५.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.५ कोटी कमवत तीन दिवसांत १०६ कोटींची कमाई केली आहे. तर, या चित्रपटात विद्या बालन, कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी अशी तगडी स्टारकास्ट आहे. 'भूल भुलैया'चा पहिला भाग २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता; ज्यात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत होता.